प्रतिनिधी / सांगली
तरुण भारतच्या सांगली आवृत्तीच्या 28 व्या वर्धापन दिन अंकाचे शुक्रवारी सांगलीत शानदार प्रकाशन करण्यात आले.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण अण्णा लाड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, भाजपा नेत्या नीता केळकर, तरुण भारत बेळगाव संपादक जयवंत मंत्री, चीफ मार्केटिंग ऑफिसर उदय खाडिलकर, सांगली आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गाव भागातील दत्त मंगल कार्यालय येथे प्रकाशन सोहळा पार पडला.
यावेळी ‘तरुण भारत’च्या गौरवास्पद कामगिरीचा आढावा घेत आमदार लाड यांनी ‘तरुण भारत’ हे सर्वसामान्यांचे मुखपत्र असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ. साळुंखे, नीता केळकर, उदय खाडिलकर, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, तरुण भारत जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळिंबकर, तरुण भारत सोशल मीडिया प्रमुख प्रसाद प्रभू, लोकमान्य मल्टिपर्पजचे विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक, शाखा व्यवस्थापक सुभाष मोरे, यांच्यासह तरुण भारत परिवारातील सदस्य उपस्थित होते. मंगेश मंत्री यांनी स्वागत विजय कडणे यांनी सूत्रसंचालन तर संजय गायकवाड यांनी आभार मानले.