डॉ. संजय देशमुख यांच्याशी गप्पाटप्पा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
‘तरुण भारत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा 37 वा वर्धापनदिन शुक्रवार 4 डिसेंबरला सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त रामेश्वर प्लाझा येथील शंकरराव गवाणकर महाविद्यालयाच्या सभागृहात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम सकाळी 11 ते 12.30 या वेळेत निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे.
‘तरुण भारत’ हे सिंधुदुर्गचे मुखपत्र आहे. गेली 37 वर्षे ‘तरुण भारत’ आणि येथील जनतेचे ऋणानुबंध आहेत. ‘तरुण भारत’च्या माध्यमातून समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी या भागात नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन दिले आहे. आणि आजही त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
‘तरुण भारत’ची परंपरा असंख्य वाचकांच्या विश्वासाच्या बळावर आजही जोपासली जातेय. याच विश्वासार्हतेच्या शिदोरीवर लाखो वाचकांच्या मनावर अधिराज्य करण्याचे भाग्य ‘तरुण भारत’ला लाभले. याच दीर्घ परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत 37 वा वर्धापनदिन शुक्रवार 4 डिसेंबर रोजी होत आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर यंदा वर्धापनदिन समांरभाचे आयोजन करण्यात आलेले नाही. मात्र, निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच वर्धापन दिनानिमित्त ‘तरुण भारत’च्या रामेश्वर प्लाझा येथील कार्यालयात सत्यनारायण महापूजा, दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत तीर्थप्रसादाचे आयोजन केले आहे.
‘तरुण भारत’च्या असंख्य वाचक, हितचिंतकांनी आजवर जपलेला स्नेह असाच यापुढेही जपावा, असे आवाहन समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संपादक जयवंत मंत्री यांनी केले आहे.