प्रतिनिधी/ रत्नागिरी
शतकोत्तरीची अक्षर सेवा देणाऱया व समृध्द परंपरेची जोपासना करत आलेल्या ‘तरूण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 26 वा वर्धापन दिन शुक्रवार 3 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या उल्लेखनीय कार्याव्दारे समाजाला प्रकाशवाटा दाखवणाऱया 10 निवडक व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव ‘तरूण भारत सन्मान’ प्रदानाने केला जाणार आहे. यासाठी जिल्हय़ातील गौरवप्राप्त व्यक्ती व संस्थांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
‘तरूण भारत’ने रत्नागिरी जिल्हय़ात 26 वर्षांची दमदार वाटचाल केलेली आहे. वाचकांशी बांधिलकी आणि विश्वासार्हतेचे अतुट नाते जपत ‘तरूण भारत’ची रत्नागिरी आवृत्ती 26 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. याचे औचित्त्य साधून ‘ट्रेंड नवा, ध्यास नवा’ या विशेषांकाचे प्रकाशन व स्नेहमेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार 3 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम शहरातील थिबा पॅलेस रोडवरील जयेश मंगल पार्क येथील सभागृहात साजरा होणार आहे. यादिवशी सायंकाळी 4.30 ते 5.30 वा. विशेषांक प्रकाशन व पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत तसेच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सायंकाळी 5.30 ते रात्री 8 या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. या कार्यक्रमास सर्व वाचक, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘तरूण भारत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
‘तरूण भारत सन्मान’चे मानकरी
- संकेत संजय चाळके – रत्नागिरी.
- सौ. वैशाली अभिजित खाडिलकर, अभिजित खाडिलकर.
- प्रतीक्षा विशेष शाळा- विलवडे ता. लांजा.
- सुभाष महिपत परब-निवेखुर्द, ता. संगमेश्वर.
- त्रिवेणी लोकसंचालित साधन केंद्र, जैतापूर, ता. राजापूर.
- सांजसोबत-चिपळूण.
- गुलाम हुसैन तांडेल- शृंगारतळी, ता. गुहागर.
- प्रेरणा प्रदीप दहिवलकर, वेरळ ता. खेड.
- डॉ. प्रसाद अवधूत करमरकर, दापोली.
- डॉ. आशिष प्रकाश जाधव, मंडणगड.
- पुढील वेगळा 2 कॉलम बॉक्स घेणे……
निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवतांची लक्षणीय कामगिरी
निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांनी साडेतीन दशकांहून अधिक काळ हवाई दलात अनेक महत्वपूर्ण पदांची धुरा सांभाळली आहे. अकस्मात व गतीमान सैनिकी कार्यवाहीसाठी हवाई छत्रीधारी सैनिकांचे (पॅराट्रपर) विशेष पथक कार्यरत असते. हेलिकॉप्टर किंवा विमानातून झेप घेऊन त्यांना कारवाई करावी लागते. या क्षेत्रात भागवत यांनी लक्षणीय कामगिरी नोंदवली. आजवर वेगवेगळ्या 20 विमानांमधून त्यांनी थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल 2400 उडय़ा मारल्या आहेत. युद्ध कार्यवाही प्रशिक्षण आणि क्रीडा स्पर्धेनिमित्ताने त्यांनी हा पल्ला पार केला. हवाई छत्रीतून उडी मारण्याचे शिक्षण देणारे दलातील अतिवरिष्ठ प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूण हे भागवत यांचे मूळ गाव. जून 1981 मध्ये हवाई दलाच्या प्रशासकीय विभागातून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. वेलिंग्टन तामिळनाडू येथील डिफेन्स सर्व्हीसेस स्टाफ कॉलेज कोर्स आणि ‘कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर’ हैद्राबादमधून ‘हायर एअर कमांड’ कोर्स केला. व्यावसायिक शिक्षणात मद्रास विद्यापीठातील एमएससी, स्टॅटेजिक स्टडीज व उस्मानिया विद्यापीठातील एम.फिल.चा समावेश आहे. प्रारंभीची 7 वर्षे हवाई दलाच्या आघाडीवरील 3 तळांवर हवाई वाहतूक नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. आग्रास्थित पॅराट्रपर प्रशिक्षण केंद्रात मुख्य प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. हवाई दलाच्या ‘आकाशगंगा’ या हवाई छत्रीधारी सैनिकांच्या संघाचे अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केले. देशातील असा एकही भाग नाही की, जिथे भागवत यांनी हवाई छत्रीद्वारे झेप घेतलेली नाही. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आदी देशांत आंतरराष्ट्रीय पॅरा सरावातही ते सहभागी झाले. हवाई दलाचे दक्षिण-पश्चिम मुख्यालय, पश्चिम मुख्यालयात वरिष्ठ अधिकारी (प्रशासन), हवाई दल मुख्यालयात महत्वाच्या पदावर काम केले. 2019 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते परम विशिष्ठ सेवा पदकाने त्याना सन्मानित करण्यात आले आहे.