राहुल गांधी यांच्या पर्यायाचा शोध : पक्षाकडून होतोय विचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपद रिक्त आहे. सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा आहेत. अनेक बैठका होऊनही काँग्रेस पक्षाला आतापर्यंत स्थायी अध्यक्षाची निवड करता आलेली नाही. राहुल गांधी यांच्या मनधरणीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. याचदरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांचे विश्वासू सहकारी अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपद देण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस पक्षातील एक गट अशोक गेहलोत यांना राजस्थानमधून दिल्लीत पाचारण करून अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा पर्याय उत्तम मानत आहे. सद्यकाळात पक्षाला स्थायी अध्यक्षाची गरज आहे, अशा स्थितीत सोनिया गांधींना स्थायी अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारावी लागेल किंवा अन्य वरिष्ठ नेत्याला पर्याय म्हणून तयार करावे लागणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
गांधी कुटुंबाचे विश्वसनीय
अशोक गेहलोत यांना गांधी कुटुंबाशी अत्यंत जवळीक असलेला नेता तसेच विश्वसनीय सहकारी मानले जाते. राजस्थानात निवडणूक जिंकल्यावर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांच्याऐवजी गेहलोत यांना प्राधान्य दिले होते, तेव्हाच गांधी कुटुंबाचा त्यांच्यावर असलेला विश्वास सिद्ध झाला होता. अध्यक्षपदासाठी जी नावे समोर आली आहेत, त्यात गेहलोत यांना सर्वात उपयुक्त मानले जात आहे. ते नव्या तसेच जुन्या नेत्यांदरम्यान ताळमेळ राखण्यास तरबेज आहेत.
निर्णय गेहलोतांच्या हातात
मागील वर्षीही अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव ते राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले नव्हते. काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय गेहलोतच घेणार असल्याचे मानले जात आहेत. पण गेहलोत सध्या स्वतःच्या मंत्रिमंडळाचा विस्तार घडवून आणू पाहत आहेत.
कपिल सिब्बलांना सल्ला
बिहार विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेस पत्रातील अंतर्गत कलह पुन्हा उघडपणे समोर आला होता. वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले होते. तर पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ति यांनीही पराभवावर चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. याच्या प्रत्युत्तरादाखल गेहलोत यांनी सिब्बल यांनाच सल्ला दिला होता. पक्षातील अंतर्गत मुद्दय़ांवर सार्वजनिकपणे चर्चा करू नये, नेतृत्वावर विश्वास ठेवावा असे गेहलोतांनी सुनावले होते.