मुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार नितीन गडकरी यांनी केली आहे. तसेच अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा गंभीर इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी नितीन गडकरींनी महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. राज्यात राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरु आहेत. या कामात शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याने गरकरींनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बने एकच खळबळ उडाली आहे.
गडकरींनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रात तीव्र संताप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला आहे. एवढंच नाही ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी घेतली आहे.