ऑनलाईन टीम / मुंबई :
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क पदभरतीसाठी नुकत्याच झालेल्या परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, यासंदर्भात वस्तुस्थिती तपासून आवश्यकता भासल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि वेळ पडल्यास या परीक्षा पुन्हा घेण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत दिली.
भाजपचे विनायक मेटे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते. या परीक्षेच्या वेळी गोंधळ झाला नाही असे एकही केंद्र नाही, पेपर फुटले गेले आहेत. ज्या संस्थेकडे हे काम दिले होते त्या संस्थेमुळे हा गोंधळ झाला असे सांगत ही परीक्षा रद्द करून पून्हा घ्यावी अशी मागणी मेटे यांनी केली.
याच धर्तीवर आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या भरती परीक्षेत गैरव्यवहार झाले असल्यास परिक्षा तत्काळ रद्द करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. सदर भरतीप्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.