व्यवस्थापन शास्त्रात मानवी कार्य आणि ध्येय जरी एकसमान असले तरीही त्यांचे स्वभाव-वैशिष्टय़ मात्र भिन्न आहेत. हे स्वभाव वैशिष्टय़ मनुष्याच्या सत्त्व, रज आणि तम गुणांमुळेच वेळोवेळी प्रगट होत असते. मनाच्या आंदोलनावर मनुष्याचे व्यक्तिमत्त्व ठरत असते. एखाद्या संस्थेतील, आस्थापनेतील, उद्योग समूहातील मालक, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कामगार जर सत्त्वगुणी असतील तर संबंधित उद्योगसमूह किंवा संस्था स्वतःचे अस्तित्व जास्त काळ टिकवू शकणार नाही. जर सगळेच रजोगुणी असतील तर तेथे गोंधळ निर्माण होईल. तसेच तेथे जर सगळेच तमोगुणी असतील तर मात्र अराजक निर्माण होईल.
श्रीसमर्थांनी मानवी स्वभाव ओळखून मनुष्याला व्यवहारज्ञानाची प्राप्ती कशी होईल याचा विचार दासबोधात मांडला आहे. मनुष्यप्राणी क्षणाक्षणाला बदलत असतो. बदल वाईटातून चांगला होत असेल तर त्या बदलाचे स्वागत करावे. पण बदल चांगल्यातून वाईटात होत असेल तर थांबावे. वाईटातून अधिक वाईट होत असेल तर असा बदल खोडून काढावा आणि स्वतःच्या मूळ स्वरूपात येण्याचा प्रयास करावा. स्वभावगुण धर्माबाबत तीन पोपटांची एक कथा आहे.
एका जंगलात तीन पोपट होते. तिन्हीही पोपट एकाच झाडावर रहायचे. एक दिवस अचानक एक शिकारी तेथे आला. त्या शिकाऱयाला पाहून ते पोपट घाबरले. शिकाऱयाने त्यांची शिकार करण्याचा प्रयत्न केला. पण जीवाच्या भीतीने तिघांनीही एकत्रितपणे उडून जाण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यात यशस्वी झाले. त्यानंतर ते तीन पोपट वेगवेगळय़ा झाडांवर रहायला लागले. बऱयाच दिवसांपासून त्या तीन पोपटांची एकमेकांशी गाठभेट होऊ शकली नाही. कालांतराने ते पोपट आपापल्या झाडांवर खूप रमले. ते झाड म्हणजेच जणू काही त्यांना आपले विश्व वाटू लागले. त्या झाडावरील पान-फुले, त्या झाडाच्या फांद्या याविषयीची आत्मीयता त्या पोपटांमध्ये निर्माण झाली. त्यातील पहिला पोपट हा नेहमी त्या झाडावरच असायचा, स्वतःच्या झाडाची तो नेहमीच काळजी घ्यायचा. त्या झाडावरून उडून बाहेर जावे हे त्याला वाटत नसे. दुसऱया झाडावरील पोपटाला झाडाविषयी प्रेम होते तो थोडाबहुत उडण्याचा प्रयत्न करी पण झाडाच्या फांद्यांवरील किडे, मुंग्या, कीटक तो खात असे. तिसऱया झाडावरील पोपटाला स्वतःच्या झाडाविषयी जरी प्रेम असले तरीही तो सतत बाहेर उडत असे. पण, जेव्हा तो झाडावर परत येई त्यावेळी मात्र झाडावरील किडे, मुंग्या, झाडाची पाने-फुले खाण्याचाही तो प्रयत्न करी. झाडावर इतर कोणाचेही अस्तित्व त्याला नको होते.
एके दिवशी अचानक तेथे शिकारी आला. त्याला आश्चर्य वाटले कारण ते तिन्ही पोपट वेगवेगळय़ा झाडांवर बसले होते. शिकाऱयाला वाटले की आपण यांची शिकार करू शकत नाही. कारण, शिकार करताना हे उडून जातील. पण घडले काही वेगळेच! शिकारी त्या तिन्ही पोपटांची शिकार करू शकला. जेव्हा तीन पोपट मरणासन्न अवस्थेत होते तेव्हा शिकाऱयाने त्यांना विचारले की, ‘मी शिकार करत असताना तुम्ही तिघेही उडून का नाही गेलात? स्वतःचा जीव तुम्ही का नाही वाचवलात?’ त्यावेळी पहिल्या पोपटाने उत्तर दिले की, ‘हे शिकाऱया, जेव्हा तू माझी शिकार करत होतास त्यावेळी मी माझ्या झाडावरील पाना-फुलांची काळजी घेत होतो. मला वाटले की माझी काळजी घेण्याची सवय बघून तू माझी शिकार करणार नाहीस. म्हणून मी उडून गेलो नाही.’ दुसऱया पोपटाने उत्तर दिले की, “ जेव्हा तू माझी शिकार करत होतास त्यावेळी मी माझ्या झाडावरील किडे, मुंग्या खात होतो. तू माझी शिकार करणार नाहीस असे मला वाटले. म्हणून मी उडालो नाही.’ तिसऱया पोपटाने उतर दिले की, ‘जेव्हा तू माझी शिकार करत होतास त्यावेळी मला वाटले की तू माझे झाड माझ्यापासून हिरावून नेणार आहेस म्हणून मी उडालो नाही.’
व्यवस्थापन शास्त्रात ‘क्ष’ सिद्धांत आणि ‘य’ सिद्धांत हे खूप मोठय़ा प्रमाणात वापरले जातात. कारण उद्योग समूह जसजसा वाढत जातो तसतसे अनेक नवीन प्रश्न निर्माण होत जातात. या प्रश्नांची उत्तरे शोधायची असतील तर उत्तम व्यवस्थापकास उद्योग समूहातील प्रत्येकाच्या स्वभावाचे नीट आकलन करूनच उपक्रमाचे उदिष्टय़ साध्य करावे लागते. ‘क्ष’ सिद्धांतानुसार काही गृहितके आहेत त्यात सामान्य मनुष्याला उपक्रमाच्या उद्दिष्टांबद्दल आत्मीयता नसल्याने काम टाळण्याकडे त्याचा कल असतो. तसेच सामान्य मनुष्य हा महत्त्वाकांशी नसल्याने इतरांनी सांगितलेले काम तो करतो आणि स्वतःची जबाबदारी टाळतो. त्यामुळे आत्मकेंद्री प्रवृत्ती वाढल्याने तो उपक्रमातील गरजांप्रती नेहमीच उदासीन असतो. या उदासीनतेमुळे सामान्य व्यक्ती चाणाक्ष आणि स्वार्थी सहकाऱयांकडून फसवली जाते. कुठलाही चांगला बदल किंवा परिवर्तनास सामान्य मनुष्याचा विरोध असतो. त्यामुळे जर व्यवस्थापनाने हस्तक्षेप केला नाही तर सामान्य मनुष्य निष्क्रिय राहतो आणि काही कालावधीने त्याचे दुष्परिणाम हे संपूर्ण उद्योग समूह किंवा व्यवस्थापनास भोगावे लागतात. याउलट ‘य’ सिद्धांतात शारीरिक आणि मानसिक परिश्रम करण्याकडे लक्ष दिले जाते. त्यात विशेषतः उपक्रमाची उद्दिष्टय़े साध्य करून घेताना नियंत्रण आणि शिक्षेची भीती या साधनांचा उपयोग करून घेतलाच पाहिजे असे नाही. तसेच उपक्रमाची उद्दिष्टय़े पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांच्या, कर्मचाऱयांच्या प्रयत्नांची गरज आणि आत्मविकासाची गरज भागवण्यात येते. उपक्रमातील परिस्थिती योग्य असेल तर सामान्य मनुष्य त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडू शकतो. उद्योगसमूहातील उपक्रमात नेहमी निर्माण होणाऱया समस्या सोडवण्यासाठी कर्मचारी आणि कामगार यांच्यामध्ये उच्च दर्जाची कल्पकता आणि सर्जनशीलता असणे आवश्यक आहे. ‘य’ सिद्धांतानुसार आधुनिक काळात उद्योग समूहातील परिस्थितीत सामान्य कर्मचार-कामगार यांच्या बौद्धिक क्षमतेचा पूर्णपणे उपयोग होतो.
श्री समर्थांनी दासबोधात याविषयी असे म्हटले आहे की,
संसाराचे बहुत कष्ट ।कैसा होईल सेवट ।
मनास आठवे संकट ।तो रजोगुण ।।
20-05-02
अखंड भ्रांती पडे ।केला निश्चय विघडे ।
अत्यंत निद्रा आवडे ।तो तमोगुण ।।
08-06-02
अंतरी स्फूर्ती स्फुरे ।सस्वरूपीं तर्क भरे ।
नष्ट संदेह निवारे ।तो सत्वगुण ।।
50-07-02
याचा अर्थ असा आहे की, संसारात खूप कष्ट आहेत असे संकट मानून जो जगतो तो रजोगुण आहे. नेहमीच गोंधळलेली परिस्थिती असल्याने केलेला निश्चय जेथे बिघडतो आणि ज्यास प्रचंड निद्रा आवडते तो रजोगुण आहे. तर अंतर्यामी स्फूर्ती जागी होऊन आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धी भरून जाते आणि त्यामुळे वाईट संशय आपोआप नाहीसे होतात तो सत्त्वगुण आहे. व्यवस्थापन शास्त्रात रज आणि तम गुणांना टाळून सत्त्व गुणाची वाढ केल्यास उत्तम व्यवस्थापन निर्माण होऊ शकते.
माधव किल्लेदार