सांगली / प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एम पी एस सी बाबत दिलेला शब्द पाळला नाही. तो तातडीने अंमलात आणा नाहीतर सरकार विरोधात राज्यभर एम पी एस सी विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
याबाबत आ. सदाभाऊ म्हणाले, अजित दादा पवार यांनी सभागृहात ३१ जुलैच्या अगोदर आम्ही या राज्यातील एमपीएससीच्या सर्व जागा भरू. रखडलेल्या नियुक्त्या देऊ. आयोग सदस्य सुद्धा तातडीने नियुक्ती करू असा शब्द सभागृहाला दिला होता.
परंतु एकही शब्द महाविकास आघाडी सरकारच्यावतीने पाळला गेला नाही. खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा कारभार या राज्यातल्या सरकारचा चालला आहे. अजून किती स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या या सरकारला पाहिजे आहेत ? आघाडी सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वासघात करणारे सरकार आहे. परंतु आम्ही या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. १५ ऑगस्ट पर्यंत परीक्षा जाहीर केल्या नाहीत, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आहेत अशांना नियुक्ती पत्र दिले नाही, आयोगावरील सदस्य नेमले नाहीत तर १५ ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यातील विद्यार्थ्यांना घेऊन करू. असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी या माध्यमातून सरकार देता आहे.