मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची जिल्हा प्रशासनांना सूचना : कोरोना वाढल्यास जिल्हाधिकारीच जबाबदार
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसांनाच जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनांना त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याची सूचना केली आहे. आवश्यकता भासली तर कठोर नियम जारी करण्याचा सल्लाही दिला आहे. सध्या जारी असणाऱया मार्गसूचीनुसार राज्याच्या सीमेवर करडी नजर ठेवावी, अशी सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनांना केली आहे.
नवी दिल्ली येथे शुक्रवारी पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना नियंत्रणासंबंधी आपण अधिकार हाती घेतलेल्या दिवशीच विधानसौधमध्ये वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. सीमेवरील तपासणी आणखी कठीण आणि संसर्ग रोखण्यासाठी सक्तीने कोविड चाचणी जारी करणे आवश्यक आहे. संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट केली जाईल, असे ते म्हणाले.
सीमेवरील जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांशी आपण फोनद्वारे चर्चा केली आहे. परराज्यातून कर्नाटकात येणाऱयांवर अधिक लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. आवश्यक असणारे सर्व नियम जारी करण्याचा सल्लाही दिला आहे. रेल्वे, बसमधून येणाऱया परराज्यातील प्रवाशांवर लक्ष ठेवणे, त्यांची कोविड चाचणी करण्याची सूचना दिली आहे.
केरळ तडजोड करू नका
सीमेलगत असणाऱया मंगळूर, कोडगू, चामराजनगर, म्हैसूर जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली आहे. केरळमधून कर्नाटकात येणाऱयांना लस आणि कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करावा. या बाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये.