आम आदमी पक्षाने व्यक्त केली भीती
प्रतिनिधी / पणजी
कळंगूटचे गावपण सुरक्षित ठेवायचे असल्यास त्याला शहरी भाग म्हणून जाहीर करू नये, अशी जोरदार मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. सरकारच्या या निर्णयास प्रखर विरोध दर्शवून सदर निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पक्षाचे कळंगूट शाखा समन्वयक मानुएल कार्दोज यांनी ही माहिती दिली. पणजीत उपजिल्हाधिकाऱयांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, महसूल सचिव यांनाही देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या कित्येक वर्षांपासून कळंगुटसह अनेक पंचायतींना शहरी भाग म्हणून जाहीर करण्याचे सरकारचे प्रयत्न चालले आहेत. परंतु प्रत्येक वेळी विरोध होत असल्याने सरकार आपला निर्णय स्थगित ठेवत होते. परंतु हल्लीच म्हणजे 27 मे रोजी जिल्हाधिकाऱयांनी आदेश काढून कळंगुटला शहरी भाग म्हणून जाहीर केला आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात असे तडकाफडकी आदेश जारी करण्यामागे सरकारने घाई का केली त्याचे कारण समजणे कठीण बनले आहे., असे कार्दोज म्हणाले.
या आदेशामुळे कळंगूट शहरी भाग बनला तरी त्याचा स्थानिकांना कोणताही लाभ होणार नाही. उलटपक्षी त्यांचे नुकसानच होणार आहे. राज्यातील अनेक राजकारण्यानी तसेच अन्य राज्यातील धनिक व उद्योजकांनी या भागात मोठमोठय़ा जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठीच सरकारचे हे प्रयत्न चालले आहेत, असा दावा त्यांनी केला. भविष्यात येथे मोठमोठय़ा इमारती बांधण्यात येतील. त्यातून लोकसंख्या वाढेल. येथील प्रसिद्ध समुद्र किनारा गिळंकृत करण्यात येईल. त्यामुळे पर्यटक स्थळ म्हणून येथे काहीच राहणार नाही. स्थानिक रापणकारांच्या तर पोटावरच पाय ठेवल्यासारखे होईल व पर्यायाने स्थानिक हद्दपार होतील, असेही कार्दोज म्हणाले. त्यामुळे सदर निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.