आंदोलनकर्त्या चिपळूण बचाव समितीचा इशारा
प्रतिनिधी/ चिपळूण
गाळ काढण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱया कार्यवाहीबाबत मान्य केल्याप्रमाणे राज्याचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमध्ये सर्व यंत्रसामुग्री लावून काम सुरू करावे, अन्यथा कोणत्याही क्षणी जलआंदोलन सुरू करू, असा इशारा शनिवारी येथील आंदोलनकर्त्या चिपळून बचाव समितीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, गेले 20 दिवस चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून नागरिकांच्या सहभागाने कोकणातील सर्वात मोठे उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्यादरम्यान राज्य सरकारने दोनवेळा बैठका घेऊन काही प्रमाणात उपाययोजना केल्या आहेत. यासाठी शासनाने मुख्य अभियंता विजय घोगरे यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार केली आहे. त्यांनी चिपळूण बचाव समितीच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून या संदर्भातली माहितीही दिली. तसेच त्यांच्याकडून सूचनाही मागवल्या. त्याप्रमाणे समिती सदस्यांनी मशिनरी व गाळासंदर्भात अनेक सूचना केल्यानंतर या सूचनांची अंमलबजावणी आपण 8 दिवसांत करू, अशी हमी मुख्य अभियंता गोगरे यांनी दिली होती.
दरम्यान, सध्या नदीत काही प्रमाणात मशिनरी आली असली तरी एकूण कामाचे स्वरूप व शिल्लक राहिलेला कालावधी पाहता हे काम पूर्णपणे मशिनरी लावूनच होणे अपेक्षित आहे. येत्या अधिवेशन काळामध्येच ही सर्व मशिनरी व दिलेला या बाबतचा शब्द पाळला नाही तर नागरिकांच्या साक्षीने व सहभागाने जलआंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
गेल्या 20 दिवसांमध्ये शासनाकडून फक्त आश्वासने देण्यात येत आहेत, परंतु त्या बाबत कोणताही कागदोपत्री अहवाल समितीकडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य शासनावर विश्वास कसा ठेवायचा, असाही प्रश्न समितीने उपस्थित केला आहे. शासनाने नेमलेल्या समितीकडे संपर्क साधून दिलेल्या कामांची व ठरलेल्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू करण्याचे पत्र द्यावे, असेही समितीने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे. तसेच आमच्या सर्वांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, आमचे आंदोलन लोकशाही चौकटीतच आहे, परंतु शासन या बाबत फार गांभीर्य दाखवत नसल्याची टीका समितीने केली आहे. शासनाने आपला निर्णय अधिवेशन संपेपर्यंत जाहीर करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.