सरपंच परिषदेचा इशारा : अनेक ठिकाणी क्वारंटाईनकडून उद्धट वर्तनाचा आरोप
वार्ताहर / कणकवली:
कोरोनाच्या लढय़ात सरपंच महत्वाची भूमिका बजावत असताना गावात सरपंचांसोबत अनेकदा हमरीतुमरीचे प्रकार घडत आहेत. काही सरपंचांच्या अंगावर हातही उचलण्यात आला. याबाबत तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याची योग्य ती दखल घेतली नाही, तर सरपंचांना कोरोनाच्या लढय़ात काम करण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा कणकवली तालुक्यातील सरपंचांनी प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकाऱयांना दिल्याची माहिती सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष राणे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे, मुंबई-पुण्याहून येणाऱयांच्या क्वारंटाईनची जबाबदारी सरपंच पर्यायाने त्या-त्या गावातील समितीवर देण्यात आली आहे. गावात सोई- सुविधा नसतानाही सरपंच दिवस-रात्र काम करत क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना सेवा देत आहेत. मात्र, क्वारंटाईन व्यक्तींचे समाधान न झाल्यास संबंधित लोक सरपंचांना मारहाण करण्यापर्यंत सरपंचांशी वाद घालतात.
ग्राम सनियंत्रण समितीचे पद कसे सांभाळायचे?
शेर्पे सरपंचांवर असाच अन्याय झाला, करंजे सरपंचांना त्यांच्या घरी येत धमकी दिल्याबाबत पोलीस व तहसीलदारांकडे तक्रार दिली आहे. मात्र, कारवाई झालेली नाही. शिडवणे येथे सरपंचांवर हल्ला होऊनही त्यांची तक्रार घेण्यास नकार देण्यात आला. त्या सरपंचांना सुमारे 5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. तुम्ही वैयक्तिक तक्रार द्या, असे सांगून दुसऱया दिवशी त्यांची तक्रार घेण्यात आली. सरपंचांसोबत गैरवर्तन केले, तर त्यावर भा. दं. वि. कलम अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे करण्यात आली आहे. या बाबींचा विचार करता, शासन व प्रशासन सरपंचांच्या पाठिशी नसल्याचे व कोणतेही संरक्षण नसल्याचे दिसून येते. अशा स्थितीत ग्राम सनियंत्रण समितीचे पद कसे सांभाळायचे?
सरपंचांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करा!
‘188 अंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरिता सक्षम अधिकारी किंवा शासकीय कर्मचारी हवा. न्यायालयात सरपंचांच्या फिर्यादीने गुन्हे दाखल केले, तर ते न्यायालय रिजेक्ट करते’, असे कोळी यांनी सांगितल्याची माहिती राणे यांनी दिली. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत स्वतंत्र आदेश काढून सरपंचांच्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्याचे अधिकार द्यावेत. शिडवणे सरपंचांबाबत जो प्रकार घडला, तेव्हा तेथील डय़ुटीवर असलेल्या शिक्षकाने तक्रार देण्यास नकार दिला. त्या सरपंचांची दुसऱया दिवशी तक्रार घेण्यात आली, असा मुद्दा कोळी यांच्याकडे मांडण्यात आला.
क्वारंटाईनबाबत स्पष्ट आदेश द्या!
सर्व सरपंचांनी प्रांताधिकाऱयांची भेट घेत, त्यांचे लक्ष वेधले. यावेळी चेकपोस्टवर चाकरमान्यांकडून घेण्यात येणाऱया हमीपत्रात अजूनही 28 दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. यामुळे गावात वाद निर्माण होतात. याबाबतचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. प्रांताधिकाऱयांनी याची तात्काळ दखल घेत संबंधितांना दूरध्वनीवरून याच्या सूचना दिल्या. ज्या तीन सरपंचांच्या पोलिसांत तक्रारी दाखल आहेत, त्याबाबत तात्काळ कार्यवाही करा, अशा सूचना प्रांताधिकाऱयांनी उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिल्याची माहिती राणे यांनी दिली.
निवेदनाची गांभिर्याने दखल घ्या!
सरपंचांसोबत स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा चांगले काम करत असल्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आले. सरपंचांच्या समस्यांबाबत अनेक निवेदने देऊनही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या निवेदनाची गांभिर्याने दखल घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच सुहास राणे, गुरुप्रसाद वायंगणकर, नारायण आर्डेकर, वनिता जाधव, दिक्षा चाळके, आर्या राणे, रिना राणे, रश्मी बाणे, देविका गुरव, आफ्रोज नावलेकर, विदीशा तेली, सुनिंद्र सावंत, सुजाता जाधव, मंगेश तळगावकर, हेमंत परुळेकर, संजय सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधणार!
आजच्या बैठकीचा संदर्भ देत कलम 188 अंतर्गत सरपंचांच्या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीकडे जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात येईल, असे प्रांताधिकाऱयांनी सांगितल्याची माहिती राणे यांनी दिली.