प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या काळात ही सोलापूर शहर जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल नागरिकांकडून लुटमारीचा धंदा करीत आहेत. काही हॉस्पिटल चांगले आहेत मात्र जे खासगी हॉस्पिटल लुटमारीचा धंदा करीत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही, लुटीचा तंत्र वापरत असाल तर हॉस्पिटलवर कारवाई करू असा इशारा राज्यमंत्री तथा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सोलापुरात दिला.
राज्यमंत्री बच्चू कडू हे पंढरपूरच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी एका खासगी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मंत्री बच्चू कडू म्हणाले, आंध्र प्रदेशातील हैदराबाद मध्ये येथे गेलो असता त्या ठिकाणी साधा मास्कच कोणी वापरत नाही, तपासणी पण होत नाही, व्यापार सुरू आहे असे तेथील नागरिकांनी सांगितले. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी मात्र महाराष्ट्र राज्यात कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा प्रादुर्भाव वाढत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.
काही हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना देत नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. सामान्य नागरिकांना जो कोणी ही योजना लागू करत नाही. त्यांच्यावर ही कारवाई करू असेही मंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे, मास्क ,सॅनिटायझर, सोशल डिस्टेंसचे पालन करावे असेही आवाहन नागरिकांना केले आहे.
तर दूध का दूध, पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही
काही साखर कारखान्याचे देणे बाकी आहे, विडी कामगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे असंख्य खाते आहेत. त्यामुळे त्याचा केवळ आढावा नाही तर दूध का दूध, पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक चूक केल्यास सोडणार नाही ?
नर्स ,डॉक्टर, सफाई कामगार यांनी जाणीवपूर्वक चूक केल्यास सहन करणार नाही, जे कर्मचारी चांगले काम कराल त्यांना खांद्यावर घेऊन नाचू मात्र सर्वसामान्यांना पायदळी तुडवत असाल तर सोडणार नाही असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी दिला.
केंद्राने पंढरपूरची पोटनिवडणूक लावण्याची गरज नव्हती
एकीकडे कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे अशा परिस्थितीत केंद्राने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक लावायला नको होते. दोन-तीन महिने उशिरा घेतले असते तरी चालले असते. त्यामुळे अस्तित्व दाखवण्यासाठी याठिकाणी पक्षांमध्ये चढाओढ आहे. असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
अजून काय काय म्हणाले, बच्चू कडू
- सत्तेचा गैरवापर कसा करायचा आहे, भाजप कडून शिकावे
- सरकारने संपूर्ण राज्यात संचार बंदी न करता ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, त्या ठिकाणी संचार बंदी करावी. अ,ब,क, ड अशा पद्धतीने अंमलबजावणी करून लॉकडाऊन करणे अपेक्षित आहे.
- पंढरपुरात महाविकास आघाडीचे भगीरथ भालके निवडून येणार, आम्ही मताधिक्य वाढीसाठी जोर लावत आहोत
- जिल्हा प्रशासनावर खापर फोडण्याऐवजी नागरिकांनीही कोरोनाचे नियम पाळावे