भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचा सवाल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुचनेनुसार उद्योग बंद करा मग ‘गोकुळ’ ची निवडणूक कशाला पाहीजे, असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधाबाबत स्पष्टता कमी आणि संभ्रमावस्थाच जास्त आहे. सोशल मिडीयावर या निर्णयाची अक्षरशः टिंगलटवाळी होत आहे. सार्वजनिक वाहतुक, खाद्य पदार्थांच्या गाड्या, पेट्रोल पंप, अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू, पण लोकांनी बाहेर पडायचे नाही, हा कसला निर्णय, असा सवालही श्री.चिकोडे यांनी या पत्रकात उपस्थित केला आहे. ठाकरे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्या भागात काही निर्बंध शिथिल केले, हे आपण समजू शकतो.
कारण, ही निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारित आहे आणि राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. पण गोकुळची निवडणूक, सहकार प्राधिकरणाच्या अखत्यारितील विषय आहे. हे प्राधिकरण राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे घेता आली असती. पण राजकीय दबावापोटी या निवडणुकीचे काही नियम तयार करण्यात आले, पण या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का नाही, हे कोण पाहणार ? कारण अलिकडेच याच निवडणुकीच्या प्रचारार्थ झालेल्या एका मेळाव्यात, एक आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्यांसह २५ ते ३० ठरावधारकांना कोरोनाची लागण झाली. एकीकडे ’ब्रेक द चेन’ करण्यासाठी मुख्यमंत्री नियम तयार करतात आणि या जिल्ह्यात हेच नियम मंत्र्यांकडून पायदळी तुडवले जातात, याला जबाबदार कोण? अशी विचारणाही या पत्रकात करण्यात आली आहे.
ज्या उद्योगांत कर्मचार्यांची रहाण्याची व जेवणाची सोय तिथेच उद्योग सुरू करण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांचे आदेश आहेत. पण कोल्हापुरच्या उद्योगांवर नजर टाकली तर अशी व्यवस्था करणारे कारखाने फारच कमी आहेत. त्यामुळे इथल्या उद्योजकांना कारखाने बंद करण्याशिवाय पर्याय नाही. यावर काहीतरी मार्ग काढण्याची गरज होती. पण ते राहीले बाजूला, हे कारखाने बंदच करा, कर्मचार्यांना पन्नास टक्के पगार द्या, असे सांगत आहेत. उद्योग बंद करा राज्यकर्त्यांना फक्त गोकुळचीच निवडणूक कशाला पाहीजे ? गोकुळच्या निवडणुकीसाठी, मंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावे होत आहेत. पण सत्तारूढ गटाच्या मेळाव्याबद्दल लगेच तक्रार करणार्यांनी, आपण मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळतो का नाही याचे आत्मचिंतन करावे.
गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन काळात उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक उद्योजक देशोधडीला लागले आहेत, कामगारांवर उपासमारीची वेळ आली, अनेक परप्रांतिय कामगार काम सोडून गावी परतल्याने, उद्योग व्यवसाय ठप्प झाला होता. नोकरी गेल्याने काही कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या, काही उद्योजकही याच मानसिकतेत होते. अलिकडे ही परिस्थितीत सुधारत असताना पुन्हा उद्योगांवर निर्बंध आणले. एकीकडे काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री यांचेकडे उद्योग सुरु रहावेत अशी मागणी करत आहेत अशा वेळी हे उद्योग सुरू रहावेत यासाठी प्रयत्न न करता, उलट ते बंद करण्याचे आवाहन राज्यकर्ते करतात याचा अर्थ काय समजावा ? असा सवाल राहुल चिकोडे यांनी पत्रात केला आहे.