आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर : कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेंगळूर
लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर मंदिरे, बाजारपेठ, विवाह समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये होणारी गर्दी पाहिल्यानंतर भीती निर्माण होत आहे. जनतेने सतर्क राहून कोरोना सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास कोरोनाची तिसरी लाट लवकर थोपविणे शक्य होणार नाही, असे मत आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केले.
चिक्कबळ्ळापूर जिल्हा दौऱयावर जाण्यापूर्वी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. लॉकडाऊन नियम शिथिल केल्यानंतर सर्वत्र लोकांची गर्दी उसल्याचे चित्र दिसून येत आहे. तज्ञांनी गर्दीविषयी सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा लोकेंकडून खबरदारी घेतली जात नाही. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. जनतेने काळजी घेतली नाही तर धोका अटळ आहे. मात्र, नागरिकांचे हे वर्तन मनात भीती उत्पन्न करीत आहे. लोकांनी स्वतः जागृत राहून सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करणे कठीण होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. तिसरी लाट सुरू झाली आहे असे अद्याप म्हणता येणार नाही. गटागटाने वावरणे, अकारण गर्दी करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मंदिरे, बाजारपेठांमधील गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनाला शक्य होत नाही. विवाह समारंभांमध्ये 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली तर तेथे 400-500 जण एकत्र येतात. हा बेजबाबदारपणा असाच राहिला तर कसे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील 60 ते 70 लोकांचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने अत्यंत खबरदारीने वावरले पाहिजे. केरळ, महाराष्ट्र राज्यांत संसर्ग पुन्हा वाढला आहे. त्यामुळे कर्नाटकात खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर 1 टक्क्याच्या खाली आला तरच कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे, असे म्हणता येईल, असेही मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
नाईट कर्फ्यू रद्दचा निर्णय घेतलेला नाही.
सध्या राज्यात जारी असणारा नाईट कर्फ्यू हटविण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याविषयी चर्चा करेन. पब सुरू करण्यास प्ररवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या नाईट कर्फ्यू सुरूच राहील, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.