कणकवली / प्रतिनिधी-
रेशनकार्ड नंबर आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. कार्डधारकांना रेशन दुकानदार अंगठा स्कॅन करणे अनिवार्य केल्याने गोरगरीब जनतेला धान्य मिळणे कठीण झाले आहे. हे लिंक करण्यात असलेल्या त्रुटी दूर कराव्यात. तालुक्यात अनेकजण धान्यापासून वंचित असून त्यासाठी इष्टांक वाढवून मिळावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने तहसीलदार आर. जे. पवार यांची भेट घेऊन करण्यात आली. यावेळी दिगवळे रांजणवाडी येथील रस्त्यावरील अतिक्रमण १५ ऑगस्टपर्यंत न हटविल्यास तालुका शिवसेनेच्यावतीने ते हटविण्यात येईल , असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, माजी जि. प. सभापती संदेश पटेल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये पं. स. सदस्य मंगेश सावंत, सचिन सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, दादा भोगले, शरद वायंगणकर, आनंद आचरेकर, गोट्या कोळसुलकर आदी उपस्थित होते. गेले दीड वर्ष कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने, तसेच ग्रामीण भागात ऑनलाईनसाठीची सुविधा अपुरी असल्याने सर्व्हरच कनेक्ट होत नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गोरगरीब जनता याबाबत अनभिज्ञ असल्याने रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे काही लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे शासन निर्णयाप माणे सदरच्या कार्डधारकांना धान्य मिळत नाही. गोरगरीब जनतेला काहीवेळा ७-८ महिने अन्नधान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांना ऑफलाईन धान्य वितरण करण्यात यावे. आधारकार्ड लिंक करण्यासाठी, कार्डप्रकार बदलण्यासाठी, कार्डला नवीन नंबर देण्यासाठी ३ महिने एवढा मोठा कालावधी लागत आहे. या त्रुटी दूर कराव्यात. तसेच तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. त्यांना धान्य मिळण्यासाठी इष्टांक वाढवून मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदरच्या इष्टांक वाढीसाठी प्रस्ताव गेलेला असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी दिगवळे रांजणवाडी येथील २३ नंबरला नोंद असलेला रस्ता फेब्रुवारी २०२१ पासून बंद करण्यात आला आहे. शासनाचे पैसे खर्च झालेल्या या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जात नाही. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासकीय पातळीवर दखल न घेतल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमण न हटविल्यास तालुका शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक अतिक्रमण हटवतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहिल, असे निवेदन देण्यात आले.