प्रदेश भाजपचे सदस्य महेश जाधव यांचा टोला
प्रतिनिधी/कोल्हापूर
पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 2018 पासून योजना अमुकवेळी पूर्ण होईल, असे सांगत दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला काळम्मावाडी धरणातील दूधगंगेची पाणी मिळेल, असे गाजर दाखवत आहेत. पण योजनेचे काम काही पूर्ण होताना दिसत नाही. संपूर्ण योजना पूर्ण कधी होणार हे सध्या कुणीही सांगू शकत नाही. कोल्हापूरकरांना गाजर न दाखविता योजनेचे काम वेळेत पूर्ण करून दाखवावे, आम्ही भाजपच्या वतीने त्यांना पाच नद्यांच्या पाण्याने अंघोळ घालू, असा टोला प्रदेश भाजपचे सदस्य महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
ते म्हणाले, महापालिकेवर दोन्ही मंत्र्यांच्या पक्षाची सत्ता आहे. आपल्या हातून योजनेचे काम वेळेत होऊ शकत नाही, त्यामुळे ते अपयश लपविण्यासाठी चंद्रकांतदादांमुळे वनविभागाच्या परवानगी मिळण्यात अडथळा आला, असे बिनबुडाचे आरोप करत आहेत, असेही महेश जाधव यांनी सांगितले.