प्रतिनिधी/ फोंडा
फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांनी येणारी विधानसभा निवडणूक मडकई मतदार संघातून व तिही कुठल्याच पक्षाचा आधार न घेता, स्वबळावर लढविण्याचे संकेत दिलेले आहेत. काँग्रेसमध्ये नवीन व तरुण उमेदवारांना संधी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. तसे झाल्यास फोंडा मतदार संघातून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून माझा मार्ग मोकळा झालेला आहे, असा दावा राजेश वेरेकर यांनी केला आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून राजेश वेरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली मोटारसायकल पायलट आणि ऑटो रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्यात आल्या. फोंडा काँग्रेस कार्यकारिणी व युवा काँग्रेसतर्फे शनिवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार परिषदेत राजेश वेरेकर बोलत होते. युवा काँग्रेसचे अध्यक्ष जाकवान मुल्ला, संपदा चोडणकर, शैलेश शेट, सांतान फर्नांडिस व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल…!
सन 1984 ते 1989 साली रवी नाईक हे मगो पक्षाचे फोंडय़ातील आमदार होते. 1989 मध्ये त्यांनी फोंडय़ाची उमेदवारी सोडून मडकई मतदार संघातून निवडणूक लढविली व ते जिंकूनही आले होते. त्यावेळी फोंडा मतदार संघातून आपले वडिल माजी मंत्री शिवदास वेरेकर हे मगोच्या तिकिटावर निवडून आले होते. येणाऱया निवडणुकीत रवी नाईक फोंडय़ाची जागा मोकळी करुन मडकईतून लढणार असल्यास या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यांच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे राजेश वेरेकर यांनी सांगितले.
कोरोनानंतर आता, इंधन दरवाढीचा फटका
मोटारसायकल पायलट हे गोव्यातील सर्वसामान्य जनतेसाठी खासगी वाहतुकीचे विश्वसनीय साधन आहे. कोरोना महामारीमुळे पायलट व ऑटो रिक्षा हा पारंपरिक व्यावसाय अडचणित आला आहे. त्यात भर म्हणून वाढत्या इंधन दरवाढीचा त्यांना फटका बसलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना छोटीशी मदत म्हणून फोंडा काँग्रेसतर्फे जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्याची माहिती वेरेकर यांनी दिली. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाची किंमत जादा असतानाही पेट्रोल व डिझेलचे दर कमी होते. भाजपाच्या सरकाच्या काळात ही परिस्थिती नेमकी उलटी आहे. कोरोनामुळे प्रवासी बस वाहतूक मर्यादित असल्याने लोकांना कामावर जाण्यासाठी नाईलाजाने आपली वाहने बाहेर काढावी लागतात. त्यामुळे सामान्य जनतेलाही इंधन दरवाढीच्या झळा बसत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे, असे वेरेकर म्हणाले.
खराब रस्ते, अपुऱया आरोग्य सुविधा, अर्धवट रखडलेला मार्केट प्रकल्प या फोंडय़ातील जनतेच्या समस्यांकडे सरकार व विद्यमान नेतृत्त्वाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.