ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे याची मला माहिती नाही. पण मी एक संवेदनशील व्यक्ती आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी आमची काही चूक झाली, तर मी माफी मागेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच मुंबई पोलीस सक्षम असून तेच या प्रकरणाचा तपास करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आमचे सरकार अजिबात अस्थिर नाही. अशा प्रकरणांमुळे सरकार अस्थिर होत असेल, तर मग केंद्रातले सरकार पडेल. मुंबई पोलीस सक्षम आहेत. तेच या प्रकरणाचा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सुचली असेल, तर ईश्वर त्यांना समबुद्धी देवो.
राऊत म्हणाले, काही जण महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचे काम करत आहेत. आगामी काळात हे कोण आहेत ते आम्ही सांगू. तसेच सुशांतच्या परिवाराकडून आलेल्या नोटिसीबद्दल बोलताना ते म्हणाले, आम्हाला 50-100 नोटीस येत राहतात. बाकी मला काहीच माहिती नाहीये. योग्य वेळ आल्यावर बोलू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.