कोलकाता/प्रतिनिधी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मनी लाँड्रिग प्रकरणी चौकशीसाठी दिल्लीत हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. अभिषेक यांना ६ सप्टेंबर रोजी, तर रुजिरा यांना त्याआधीच १ सप्टेंबर रोजी बँक खात्यांच्या तपशीलासह ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. आणखी तीन जणांना चौकशीचे समन्स बजावण्यात आले. तसेच अभिषेक आणि त्यांची पत्नी रुजिरा यांच्यावर कथित कोळसा घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. रम्यान अभिषेक बॅनर्जी यांनी आपण चौकशीसाठी तयार असल्याचं सांगताना जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर लोकांसमोर फाशीची शिक्षा दिली जावी असं म्हटलं आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत.
अभिषेक बॅनर्जी लोकसभेतील डायमंड हार्बर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि ते तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्या आधी १ सप्टेंबरला ईडीने रुजिरा बॅनर्जी यांनी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. मात्र दोन लहान मुलं असल्याने उपस्थित राहण्यास नकार देत त्यांनी कोलकातामधील आपल्या घरी चौकशी करावी अशी विनंती केली होती.
दरम्यान दिल्लीला जाताना अभिषेक बॅनर्जी यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “नोव्हेंबरमध्ये जाहीर सभेत जे मी बोललो होतो त्याचा पुनरुच्चार करत आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारात माझा १० पैशांचाही संबंध असल्याचं सिद्ध करु शकले तर ईडी किंवा सीबीआय चौकशीची गरज नाही. मी स्वत: सर्वांसमोर फाशी घेईन”.