ऑनलाईन टीम / मुंबई :
कोकणातील शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींवरच निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे नसते, तर नरेंद्र मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
सावर्डे येथे शिवसेना मेळाव्यात जाधव बोलत होते. ते म्हणाले, गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले. बाळासाहेबांनी काही झाले तरी नरेंद्र मोदींना पदावरुन हटवायचे नाही असे सांगितले होते. त्यामुळेच आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. अन्यथा त्या दिवशीच मोदी घरी गेले असते.
बाळासाहेबांचे फोटो लावूनच भाजपने पक्ष वाढवला आहे. आता मराठी माणसांना संपविण्याचा भाजपने डाव आखला आहे. मुंबई महानगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप सूडबुद्धीने वागत आहे. ईडी, इन्कम टॅक्स अशा केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.