नवी दिल्ली/प्रतिनिधी
घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ जनतेवर अन्याय असल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली. “मोदी सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे”, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. यांनतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावातही वाढीवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
एकीकडे आपल्या मित्रांच्या संपत्तीत अब्जावधींची वाढ होत आहे तर दुसरीकडे सामान्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एलपीजी इंधन आणि पेट्रोल-डिझेलच्या भावातही वाढ केली जात आहे. हाच भाजपचा विकास असून आता या विकासाला माघारी पाठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी सांगितलं. भाजपच्या सबका साथ , सबका विकास या धोरणाचा खरा अर्थ हा अत्यावश्यक गोष्टींच्या किंमतीत वाढ करण्याचा असल्याचंही टीका त्यांनी केली.काँग्रेस महासचिव प्रियांका गांधींनी एका ट्वीटच्या
माध्यमातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की, “मोदीजी आपल्या राज्यात दोन प्रकारचाच विकास होत आहे. एकीकडे आपल्या अब्जाधीश मित्रांच्या संपत्तीत वाढ होत आहे तर दुसरीकडे सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या वस्तुंच्या महागाईमध्ये वाढ होतेय. जर हाच ‘विकास’ असेल तर या ‘विकासा’ला आता सुट्टी देण्याची गरज आहे.”