ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे.
ते म्हणाले, केवळ चारपाच उद्योगपतींसाठी काम करणारे हे सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत आहे. उद्या जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मोदीं विरोधात बोलले, तर त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढवला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आझाद यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या 2 कोटी सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना देऊन कृषी कायदामागे घेण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
शेतकरी त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाहीत. त्यांच्याविरोधात कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही तर केवळ भाजपचे किंवा संघाचेच नुकसान होणार नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होणार आहे, असे सांगतानाच केवळ चारपाच उद्योगपतींसाठीच हे सरकार काम करत आहे. म्हणूनच मोदींविरोधात जे कोणी उभे राहतात त्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. आज शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवले जाते आहे. उद्या मोहन भागवतही मोदींविरोधात बोलल्यास त्यांनाही अतिरेकी ठरवले जाईल, अशी टीका ही राहुल गांधी यांनी यावेळी केली.