ऑनलाईन टीम / सोलापूर :
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा निर्णय चुकला, अन्यथा राज्यात भाजपची सत्ता आली असती, असा टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
सोलापूरातील अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलेल्या राणे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी एका कार्यकर्त्याने सध्याच्या राजकारणावर प्रश्न केला. त्याला उत्तर देताना राणे बोलत हेते.
राणे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती करुन चूक केली. ही चूक भाजपने केली नसती, तर आता राज्यात भाजपची सत्ता आली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीतील काहीही कळत नाही. ते शेतकऱयांचा सातबारा कोरा कसे करणार, ते शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहेत. त्यांचा यासंदर्भात कोणताही आभ्यास नाही, प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे हे सरकार दोन महिनेही टिकणार नाही, असेही ते म्हणाले.