भारतीय समाजव्यवस्थेने संपूर्ण विश्वाला कुटुंबसंस्था नावाचे एक वरदान किंवा देणगी दिलेली आहे. त्यामुळेच आपले राष्ट्र जगद्गुरु आहे. आपल्या संपन्न राष्ट्राचा इतिहास हा पाच सहस्त्र वर्षांहून अधिक कालावधीचा आहे, असे अनेकजण समजतात पण खरे तर प्राचीन-अर्वाचीन काळापासून भारताचा इतिहास आहे आणि बहुधा तेवढीच जुनी आपल्या येथील कुटुंबसंस्था आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही बराच काळ संयुक्त कुटुंबसंस्था अस्तित्वात होती. पुढे कालांतराने जी एकत्रित अथवा संयुक्त कुटुंबसंस्था होती तीच नंतर विभक्त कुटुंबपद्धतीत प्रवर्तित झाली. पण कुटुंब लहान असो अथवा मोठे ही पद्धत/संस्था आजही आपल्या देशात मूळ धरून आहे.
मनुष्याचा वैचारिक, सांस्कृतिक, बौद्धिक किंवा सांपत्तिक विकास हा कुटुंबसंस्थेत राहिल्यानेच होतो. आपल्यातील गुणावगुणांची माहिती ही आपल्या कुटुंबातच राहिल्याने प्राप्त होते. जेव्हा आपण एकटे असतो त्यावेळी आपण सहसा एकलकोंडे, दुष्प्रवृत्त किंवा अगदीच चांगले वर्तन करणारे असतो. एकटेपणा हा आपल्याला टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडतो. एकत्र अतिचांगुलपणा किंवा अतिशय वाईट प्रवृत्तीचा धुमाकुळ मनुष्याच्या वागण्या-बोलण्यात जाणवतो. पण जेव्हा कुटुंबसंस्थेशी आपण संबंधित असतो त्यावेळी मात्र आपल्यात एक समतोल जाणवतो. अविचाराची जागा विचाराने घेतली जाते, अविवेकीपणा हळूहळू नाहीसा होऊन विवेकाची प्राप्ती होते.
श्रीसमर्थांनी ग्रंथराज दासबोधात मनुष्याच्या जीवनात समतोल कसा राहील, मनुष्याचे मन, बुद्धी आणि व्यवहार हे संतुलित कसे राहतील ह्याविषयी अतिशय तळमळीने लिहिले आहे. कारण या सृष्टीचा गाडा जर पुढे न्यायचा असेल तर मनुष्यनिर्मिती ही अत्यावश्यक आहे. उत्तम मनुष्याची निर्मिती ही सत्संगतीनेच होते. अन्यथा मानवी मन हे सतत कटकट, इतरांचा द्वेष, राग, सूड, असूया, तक्रार, स्पर्धा ह्यात मलीन होते. या मनाला योग्य ते संस्कार देऊन त्यास सक्षम बनवणारे रामबाण औषध म्हणजेच श्रीसमर्थांचा दासबोध होय! श्रीसमर्थ म्हणतात की,
शोध घेतां आळसो नयें !
भ्रष्ट लोकीं बैसो नयें !
बैसले तरी टाकू नयें !
मिथ्या दोष !!
अंतर आर्तचे शोधावे !
प्रसंगी थोडेची वाचावे !
चटक लाउनी सोडावे !
भल्या मनुष्यासी !!
19/02/12-13
याचा अर्थ चांगल्याचा शोध घेण्याकरिता आळस करू नये. भ्रष्ट लोकांमध्ये बसू नये. जर भ्रष्ट लोकांमध्ये बसण्याची वेळ आलीच तर तिथल्या तिथे त्यांचे विचार, दोष टाकून द्यावे. आर्त मनुष्याचे मन जाणावे. त्यास थोडेच शास्त्र वाचून दाखवावे. मग त्यास ह्याची आपोआप गोडी निर्माण होईल आणि तो सन्मार्गास
लागेल.
व्यवस्थापनाच्या दृष्टीने ह्या ओवीचा विचार केल्यास कुठल्याही व्यवसाय संस्थेस अथवा शासकीय संस्थेत किंवा सामाजिक संघटनेत कामगाराच्या, कर्मचाऱयांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या त्यांचे मनस्वास्थ्य बिघडवतात. ह्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर आणि उत्पादकतेवरसुद्धा परिणाम होतो. संघटनेत मुक्त मनाने आणि स्वेच्छेने त्यांचे सहकार्य इतरांना मिळू शकत नाही. जर संबंधित संस्थेत एखादी प्रक्षोभक परिस्थिती निर्माण झाली तर अशावेळी मात्र व्यवस्थापकीय यंत्रणा अडचणीत येऊ शकते. म्हणूनच संस्थेत-संघटनेत काम करत असताना जे सत्प्रवृत्त लोक आहेत त्यांचा शोध घेण्यास कधीही आळस करू नये. भ्रष्ट, अविचारी किंवा अविवेकी लोकांशी मात्र सलगी करू नये. जर असे लोक संपर्कात आलेच तर त्यांच्या बोलण्या-वागण्याकडे लगेच दुर्लक्ष करावे. परंतु एखादी व्यक्ती जर भूतकाळात चुकली असेल आणि सद्यस्थितीत त्याला/तिला स्वतःची चूक कळली असेल तर मात्र अशा व्यक्तीस योग्य मार्गावर आणावे. मग त्या व्यक्तीसच सन्मार्गाची आणि सत्कर्माची आवड निर्माण होईल आणि त्याचा ‘न भूतो न भविष्यती’ असा फायदा संस्थेला वा संघटनेला होऊ शकतो. व्यवसाय संस्थेतील कर्मचारी जर आशावादी नसतील आणि असमाधानी असतील तर ते व्यक्त करण्याचे माध्यम त्यांना मिळायला हवे. अशा माध्यमातून हक्कासंबंधीचे त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे. अशाप्रकारचे माध्यम हे ऊर्ध्वगामी संदेश वहनाचे कार्य करत असते. सादृश्यता, सुस्पष्टता, सुलभता आणि तत्परता ह्या कर्मचाऱयांच्या तक्रार निवारण करणाऱया यंत्रणा आहेत. कायद्याने राबवली जाणारी यंत्रणा ही अस्तित्वात असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन होते आहे की नाही हे ठरवते. म्हणजेच त्यात सादृश्यता असते. तक्रार करणारा कर्मचारी अथवा कामगाराने कोणाकडे निवेदन द्यावयाचे, कोणाकडे अर्ज करायचा, तक्रारीचा कालावधी किती आहे, कसा असावा ह्याविषयीची माहिती देणे, तसेच तक्रार निवारण करणाऱया अधिकाऱयांना त्यांचे अधिकार कोणते आणि किती आहेत, अधिकाऱयांकडून काय अपेक्षित आहे, कोणत्या मर्यादेपर्यंत मदत केली जाऊ शकते याचे स्पष्ट स्वरूप ज्या तत्त्वांतर्गत येते त्यास सुस्पष्टता असे म्हणतात.
प्रत्येक तक्रारकर्त्याला व्यवस्थापन यंत्रणेतील अनेक टप्पे, सादर करायचे अर्ज आणि भरायचे अर्ज, साक्षीदार ह्या सर्वांची एकत्रित माहिती जेथून प्राप्त होते त्यास सुलभता असे म्हणतात. कर्मचाऱयांना किंवा कामगारांना तक्रार निवारण्यासाठी जर क्लिष्ट मार्गाचा अवलंब करावा लागत असेल, अनेकवेळा अर्ज करावे लागत असतील तर ते अशा दुर्लभ तत्त्वाचा अवलंब करणारच नाहीत.
तसेच आपण किती कमी वेळात एखाद्या तक्रारीचे निवारण करतो ह्यावरच त्या व्यवस्थापन यंत्रणेचे यश अवलंबून असते. न्यायास विलंब याचा अर्थ न्याय नाकारला गेला असे मानले जाते. म्हणूनच तत्परतेने कार्य करणे हे प्रत्येक औद्योगिक संस्थेचे प्रथम कर्तव्य असावे. तक्रारीचे निवारण केल्यानंतर ज्या संस्थेतील मानवसंसाधन विभाग संबंधित तक्रारीचा मागोवा घेते ती औद्योगिक संस्था अधिकाधिक प्रगती करते. मानव संसाधन विभागाने तक्रार निवारण यंत्रणेत वेळोवेळी बदल घडवणे आणि अपेक्षित बदल सुचवणे गरजेचे
असते.
कुटुंब संस्थेतील सर्व नियम हे बहुतांश प्रमाणात संस्थेत वा संघटनेस लागू पडतात. आपल्या देशातील टाटा उद्योग समूहासारख्याच अनेक औद्योगिक संस्था हे असेच एक उत्कृष्ट कुटुंब आहे. म्हणूनच व्यवस्थापन क्षेत्रास एक उत्कृष्ट कुटुंब बनवायचे असेल तर श्रीसमर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील तत्त्वांचा अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाही. ग्रंथराज दासबोधातील व्यवस्थापकीय तत्त्वांचा जो व्यवस्थापक, नेता, शिक्षक अथवा उद्योजक समर्थपणे अभ्यास करून त्यांचे आचरण करेल तीच त्याची/तिची खरी गुरुदक्षिणा श्रीसमर्थ रामदास स्वामींना अर्पण होईल.
माधव किल्लेदार