- मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक
ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा आरक्षणासाठी आता संभाजी राजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संभाजी राजे उपस्थित होते. ते म्हणाले, 11 ऑक्टोबरला एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील. एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचे ऐकले नाही तर, मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
पुढे ते म्हणाले, राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा समाज आजवर सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे गेला आहे. मराठा रक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवले गेले. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणा वाढला. मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला मी तयार आहे. मला सर्वांनी सांगितले की तुम्ही नेतृत्व करा, परंतु मी सगळ्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. मराठा समाजाने काढलेल्या 58 मोर्चांची दखल देशातच नव्हे तर जगाने देखील घेतली आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने फसवले आहे. मात्र, मराठा समाजाला पूर्ण आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी आमचा लढा आहे. आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठा समाजाला टाकू नये. आर्थिक दुर्बल घटकामध्ये मराठा समाजाला टाकलेले खपवून घेणार नाही’, असा इशाराही संभाजीराजे यांनी यावेळी दिला.