उपमुख्यमंत्री सवदी यांचे परिवहन कर्मचाऱयांना आश्वासन : निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर वेतनवाढ
प्रतिनिधी / बेंगळूर
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचाऱयांनी 7 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पत्रकार परिषद घेऊन डिसेंबरमध्ये परिवहन कर्मचाऱयांनी संप केल्यामुळे जनतेचे हाल झाले. त्यामुळे सरकारने परिवहन संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करून 9 मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यापैकी 8 मागण्या पूर्ण केल्या आहेत. आता राज्यात पोटनिवडणुका आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने परवानगी दिली तर सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसींप्रमाणे वेतनवाढ करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
परिवहन कर्मचाऱयांना आरोग्य भाग्य योजना, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 30 लाख रुपयांची मदत, कर्मचाऱयांच्या आंतरनिगममध्ये बदल्या, वरिष्ठ अधिकाऱयांचा जाच थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना, प्रवाशांनी तिकीट न घेतल्यास कंडक्टरांवर होणारी कारवाई स्थगित, दरवर्षी एकूण कर्मचाऱयांच्या 2 टक्के प्रमाणात बदल्या, प्रशिक्षण कालावधी दोन वर्षावरून एक वर्ष, अशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आता राज्य सरकार सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ देण्यास सरकार तयार आहे, असे ते म्हणाले.
मागील वर्षापासून कोरोनामुळे प्रवाशांची संख्या 60 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे मिळणारे उत्पन्न बसेसच्या इंधन आणि वेतनावर खर्च होत आहे. नुकसान होऊन देखील कर्मचाऱयांच्या वेतनात कपात केलेली नाही. राज्यात पोटनिवडणुका होत असल्याने आचारसंहिता जारी आहे. त्यामुळे कोणत्याही योजनांची घोषणा करता येत नाही. त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने संमती दर्शविली तर वेतनवाढ करण्यात येईल. याबाबत अर्थखात्याशी चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱयांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन लक्ष्मण सवदी यांनी परिवहन कर्मचाऱयांना केले आहे.
परिवहन कर्मचाऱयांनी संप केल्यास विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेला त्रास होईल. मागील वर्षी डिसेंबरमध्ये चार दिवस संप केल्याने 7 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. न्यायालयाने देखील आपल्याला नोटीस बजावली आहे. सरकारही तुमच्या बाजूने आहे, असेही ते म्हणाले.
पर्यायी व्यवस्थेसाठी सज्ज
परिवहन कर्मचाऱयांनी संप पुकारल्यास पर्यायी व्यवस्थेची तयारीही राज्य सरकारने केली आहे. संप केल्यास खासगी बसेसची व्यवस्था करावी लागेल. खासगी बस मालकांनी करामध्ये सूट देण्याची मागणी केली असून याबाबतची विचार करण्यात येईल. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी खासगी बसेसचा पर्याय तयार ठेवण्यात आला आहे, असेही लक्ष्मण सवदी यांनी स्पष्ट केले.
कामावर हजर रहा..!
आठवडी सुटी, तातडीच्या रजा वगळता 7 एप्रिलपासून सर्व परिवहन कर्मचाऱयांनी कामावर सक्तीने हजर रहावे, असा आदेश केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी कळसद यांनी दिला आहे. विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱयांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवयोगी कळसद यांनी कर्मचाऱयांना सक्तीने कामावर हजर राहण्याची सूचना दिली असून रजेवर गेल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.