ऑनलाईन टीम / नांदेड :
तीन पक्षाचं सरकार म्हणजे मल्टिस्टारर सिनेमा. सिनेमात तीन-तीन हिरो पाहिजेत, असं वक्तव्य राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. तसंच संविधनाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, हे शिवसेनेकडून लिहून घ्या, असं सोनिया गांधींनी सत्ता स्थापनेच्या वेळी सांगितलं होतं.
शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते सचिन खेडेकरही उपस्थित होते.
सरकार सत्तेत आल्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधान करणे सुरू आहेत. नांदेडमध्ये बोलताना अशोक चव्हाण यांनी सरकार स्थापण करण्याविषयीचा गौप्यस्फोट केला. सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू.