ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे. गरज पडल्यास सैन्याला पाचारण करावे लागेल. पण सरकारवर सैन्य बोलावण्याची वेळ येऊ देऊ नका, सैन्य बोलावणे हा शेवटचा उपाय आहे असे म्हणत सरकारच्या आदेशाचे पालन करा असे आवाहन पुन्हा एकदा राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जनतेला केले आहे. आज पवार यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आत्तापर्यंत जसा धीर धरला आहे तसाच आणखी दोन आठवडे धीर धरा. राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना सुरू आहेत. मात्र याचबरोबर तुम्हां सर्वांचे सहकार्य देखील आवश्यक आहे. त्यामुळे सरकार ने दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं ते यावेळी म्हणाले.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित कार्यक्रमाबद्दल बोलताना पवार म्हणाले, मरकजच्या कार्यक्रमाचा परिणाम संपूर्ण देशात झाला आहे. पण हा कार्यक्रम टाळता आला असता. महाराष्ट्रात असं घडू देणार नाही. असं ही ते म्हणाले. तसेच मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी असं ते म्हणाले.
तसेच लॉक डाऊन च्या काळात वाचन वाढवा. शिवराय, फुले दाम्पत्य, आंबेडकर याचे साहित्य वाचा असा सल्ला त्यांनी युवा पिढीला दिला आहे.