सातारा / प्रतिनिधी :
लोकशाहीचे तुम्ही राजे आहात. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात. हे कदापि विसरु नका. कोणीही असू द्या. हे मला सुद्धा लागू होतं. त्यामुळे वारंवार मागणी करुन सुद्धा आज अधिवेशन बोलवलं जात नाही. श्वेतपत्रिका जाहीर केली नाही. अजूनपर्यंत कुठतरी, कायतरी पाणी मुरतय असचं म्हणावं लागलं. आणि नसेल पाणी मुरत तर घ्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर स्पेशल दोन दिवसाचे अधिवेशन. लोकांचा उद्रेक झाला तर तुम्ही आणि तुम्हीच जबाबदार असाल, असा राज्यकर्त्यांना गंभीर इशारा खासदार श्री. छ. उदयनराजेंनी दिला.
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे म्हणाले, दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत आहे. अत्यंत गांभीर्याने महाराष्ट्र शासनाने याकडे बघायला हवं होतं. पण तसं पहायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी स्वतः जबाबदारी दुसऱ्यावर झिडकारुन टाकणे हे योग्य नाही. आज राज्यकर्ते म्हणून तिथे राज्यकारभार पहाताना प्रत्येकाची जबाबदारी आहे. मग मराठा समाजाचे आमदार असतील मराठा समाजाचे जे आमदार नाहीत ते. या सगळय़ांची संयुक्तीक अशी जबाबदारी आहे. आम्ही कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले होते. त्यासंदर्भात मला थोडसं बोलावसं वाटतं. पाच-सहा मुद्यांचा आम्ही उल्लेख केला होता. पहिल्या प्रथम म्हणजे सारथी संस्था जी आहे, तिला किमान एक हजार कोटी रुपये देण्यात यावेत. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यास दोन हजार कोटींची तरतूद करण्यात यावी. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यात यावेत. सुपर न्युम्रररी पोस्ट निर्माण कराव्यात. राजर्षी शाहु महाराजांची जी योजना आहे, ती या अगोदर अस्तित्वात होती. ती पुन्हा लागू करण्यात यावी. या संपूर्ण विषयांवर बऱ्याच वेळा चर्चा झाल्या. त्यातून फार काय फाय काय म्हणण्यापेक्षा काहीच निकाली निघाली नाही. आज मराठा समाजामध्ये फार मोठया प्रमाणात असंतोष आहे. या सगळय़ाला जबाबदार हे सगळे राज्यकर्ते आहेत. आमदार असतील खासदार असतील. त्यामुळे प्रत्येकाने थोडस विचार करण्याची गरज आहे. राजकारण तुम्ही जरुर करा. आपापल्या परीने जे कोण कुठल्या पक्षातील असतील त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न जरुर करावेत. पण तुम्ही समाजात तेढ निर्माण करू नका.
एकतर मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता. जी स्वराज्याची संकल्पना होती. ती तर लांबच राहिली. कोणताही पक्ष नाही की शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. प्रत्येकाची जबाबदारी आहे की, या थोर व्यक्तीचे नाव घेत असताना त्यांचे विचार आचरणात आणलेले पहायला मिळाले पाहिजेत. आपण देशभरात, जगभरात सगळीकडे सांगतो की भारत ही सगळय़ात मोठी लोकशाही आहे आणि असे जर चालत राहिले तर उद्या तुम्ही आम्ही असो नसो पण कालातंराने काळ तुम्हाला माफ करणार नाही. कारण या देशाचे याच मुद्यावरती तुकडे झालेले पहायला मिळतील. आणि जो देश आपण अभिमानाने सांगतो हा भारत देश सगळयांत मोठी लोकशाही आहे. हे सुरेख चित्र फार काळ टिकणार नाही. जसे रशियाचे टुकडे झाले त्या प्रकारे भारताचीही तशीच अवस्था होणार.
माझी हात जोडून विनंती आहे या सर्व राज्यकर्त्यांना तुम्ही सर्व कुठल्याही जातीतले असला तरी तुम्ही महान आहात.तुम्हाला लोकांनी निवडून दिले. लोकशाहीतले तुम्ही राजे आहात. आज तुमच्या हातात धुरा दिली आहे.ती धुरा तुमच्या हातात दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा असतात त्याला कुठेतरी तडा जाता कामा नये. जर उद्रेक झाला तर त्याला फक्त आणि फक्त राज्यकर्तेच जबाबदार असतील.