नासाचा भीती वाढविणारा अहवाल : मैदानी भागांमध्येही मोठे नुकसान होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पृथ्वीचे तापमान वाढल्याने भारतात कसा हाहाकार उडणार यासंबंधीचा भीतीदायक अनुमान अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने स्वतःच्या अहवालात व्यक्त केला आहे. हा अहवाल सुमारे 80 वर्षांनंतरची म्हणजेच 2100 पर्यंतची स्थिती मांडणारा आहे. समुद्राची पातळी वाढल्याने भारताची 12 किनारे शहरे 3 फुटापर्यंत पाण्यात बुडालेली असतील. सतत वाढणाऱया उष्णतेमुळे ध्रूवीय भागातील हिम वितळल्याने ही स्थिती ओढवणार आहे.
या संकटाचा प्रभाव भारतातील ओखा, मुरगाव, कांडला, भावनगर, मुंबई, मंगळूर, चेन्नई, विशाखापट्टणम, तूतिकोरिन, कोची, पारादीप आणि पश्चिम बंगालच्या किडरोपोर भागावर पडणार आहे. अशा स्थितीत भविष्यात या भागांमध्ये राहणाऱया लोकांना या ठिकाणांवरून स्थलांतर करावे लागू शकते.
नासाचे नवे टूल
नासाने एक सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केले आहे. यामुळे समुद्र किनाऱयांवर येणाऱया आपत्तींदरम्यान योग्यवेळी लोकांना हलविणे आणि आवश्यक व्यवस्था करण्यास मदत होणार आहे. या ऑनलाईन टूलद्वारे कुणीही भविष्यात येणारी आपत्ती म्हणजेच वाढत्या सागी पातळीबद्दल माहिती मिळवू शकणार आहे.
आयपीसीसीचा अहवाल
नासाने इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालाचा दाखला देत अनेक शहरे समुद्रात बुडणार असल्याचा इशारा दिला आहे. आयपीसीसीचा हा सहावा असेसमेंट अहवाल आहे. आयपीसीसी 1988 पासून जागतिक पातळीवर हवामान बदलाचे आकलन करत आहे. हा पॅनेल दर 5-7 वर्षांमध्ये जगभरातील पर्यावरणीय स्थितीसंबंधी अहवाल सादर करतो. यंदाचा अहवाल अत्यंत भयावह स्थितीचा संकेत देणारा आहे.
मैदानी भागांमध्येही संकट
2100 सालापर्यंत जगाचे तापमान मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. लोकांना भीषण उष्णतेला तोंड द्यावे लागणार आहे. कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण न रोखण्यात आल्यास तापमानात सरासरी 4.4 अंश सेल्सिअसची वाढ होणार आहे. पुढील दोन दशकांमध्ये तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार आहे. या वेगाने पारा चढल्यास हिमखंड वितळू लागतील. त्यातील पाणी मैदानी आणि सागरी भागांमध्ये मोठे संकट घेऊन येणार आहे.
क्षेत्रफळ घटणार सी लेव्हल प्रोजेक्शन टूल जगभरातील नेते आणि वैज्ञानिकांना पुढील शतकापर्यंत आमच्या अनेक देशांची भूमी कमी होणार आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहे. समुद्राची पातळी अत्यंत वेगाने वाढणार असल्याने त्यातून सावरणे अवघड ठरणार आहे. आताच अनेक बेटे बुडाली आहेत. तर अनेक बेटे सागरात गडप होण्याच्या वाटेवर आहेत.