राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 50 टक्के निधी ; पाणी तुटवडय़ावर करता येणार मात, बागायतदारांना फायदेशीर
प्रतिनिधी /बेळगाव
फलोत्पादन खाते बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत बागायत शेतकऱयांना तलाव खोदाईसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. उन्हाळय़ातील पाण्याचा तुटवडा कमी करण्यासाठी खात्याने महत्त्वाकांक्षी योजना राबविली आहे.
जिल्हय़ात 16 हजार 238.29 हेक्टर क्षेत्रात विविध फळांची लागवड झाली आहे. यातून तब्बल 3 लाख 44 हजार 641.71 मेट्रिक टन उत्पादन झाले आहे. विशेषतः आंबा, काजू, द्राक्षे, कलिंगड, पपई, नारळ, लिंबू, केळी, चिकू, सीताफळ, फणस आदी फळांचा समावेश आहे. जिल्हय़ात फळ लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे उन्हाळय़ाच्या दिवसांत म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याचा तुटवडा भासू नये, याकरिता बागायतदारांना तलाव खोदाईसाठी अनुदान दिले जात आहे.
अथणी, हुक्केरी, गोकाक, कागवाड, निपाणी, बेळगाव आदी तालुक्मयात फळांचे उत्पादन होते. मात्र उन्हाळय़ाच्या दिवसात पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे उत्पादनात घट होवून फटका बसतो. पावसाचे पाणी साठवून रहावे, याकरिता तलाव खोदाईला प्रोत्साहन दिले जात आहे. तलावात साठलेल्या पाण्याचा वापर उन्हाळय़ाच्या दिवसात होणार आहे. त्यामुळे हा तलाव बागायतदारांना फायदेशीर ठरणार आहे. संबंधित बागायतदारांनी तालुका बागायत खात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे.