नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील तळई गावातील दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.
“महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. तळई गावात दरड कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.