प्रतिनिधी/ काणकोण
एरव्ही समुद्राच्या पाण्याचा रंग निळसर असतो. मात्र 3 रोजी तळपण किनाऱयावरील नागरिकांनी समुद्राच्या हिरव्या रंगाच्या पाण्याचा अनुभव घेतला. एकापाठोपाठ एक येणाऱया फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा हिरव्या रंगाचा शालू परिधान केल्याप्रमाणे भासत होत्या. अशा प्रकारचा अनुभव पहिल्यांदाच आपण घेत असल्याची माहिती किनाऱयावरील नागरिकांनी दिली. हे दृष्य पाहण्यासाठी किनाऱयावर गर्दी झाली. तालुक्यातील अन्य किनाऱयांवर अशा प्रकारचा अनुभव आला नसल्याची माहिती मिळाली आहे. पाण्याचा रंग अकस्मात बदलण्याची कारणे समजू शकली नसली, तरी पर्यावरणात होणारा बदल, समुद्रात वाढलेले शेवाळ किंवा रासायनिक पदार्थ समुद्रात सोडल्याने असे घडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.