ऑनलाईन टीम / महाड :
रायगडच्या महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी सायंकाळी दरड कोसळून 32 घरे गाडली गेली. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. तळीयेतील उध्वस्त झालेली ही घरे पंतप्रधान आवास योजनेतून बांधून दिली जातील, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
कोकण दौऱ्यावर असलेल्या राणे यांनी आज महाडमधील तळीये गावाची पाहणी केली. तसेच तेथील नागरिकांना राणेंनी धीर देण्याचा प्रयत्न केला. तळीये येथील दुर्घटनेत आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप 35 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती असून त्यांचा शोध सुरू आहे. गेलेली माणसं आपण परत आणू शकत नाही. मात्र, जे लोक आहेत त्यांना पण दिलासा देऊ शकतो. आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरात देण्यात येतील, असे आश्वासन राणे यांनी यावेळी दिले.