पाण्यासाठी भटकंती : तांत्रिक कारणामुळे पाणीटंचाई : सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर /तवंदी
तांत्रिक कारणामुळे तवंदी ग्रामस्थांना 8 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या समस्येची दखल घेत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रा. पं. प्रशासनाने पुढाकार घ्यावा. तसेच सदर तांत्रिक अडचण दूर करताना नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी तवंदी ग्रामस्थांतून होत आहे.
तवंदी गाव डोंगरमाथ्यावर वसले आहे. गावची लोकसंख्या जवळपास 1200 हून अधिक आहे. वेदगंगा नदीतून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र काही तांत्रिक कारणामुळे गावच्या पश्चिमेकडील भागात 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे.
यामुळे नागरिकांना कूपनलिका आणि विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. येथील पाण्याची टाकीदेखील जीर्ण झाल्याने काही महिन्यापूर्वीच सदर टाकी जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान 50 हजार लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. गावच्या पूर्वेकडील भागातून पाईपलाईनच्या माध्यमातून टाकीत पाणी सोडण्यात येते. मात्र सदर टाकीमध्ये पाणी चढविताना काही अडचणी येत आहेत.
यामुळे गावात सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी
नागरिकांना उपलब्ध होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या झळा आणि त्यातच पाणीटंचाईचे संकट यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पाणीटंचाईमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. गावामध्ये 3 कूपनलिकांच्या माध्यमातून पाण्याचा आधार मिळत आहे. या कूपनलिकांचे पाणी जलकुंभात सोडण्यात येते. सदर पाण्याचा वापर नागरिक करीत आहेत. वयोवृद्ध व महिला जलकुंभात कूपनलिकेच्या माध्यमातून मिळणाऱया पाण्याचा आधार घेत आहेत. लोखंडी हातगाडे, सायकल आणि दुचाकीचाही पाणी आणण्यासाठी वापर नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढत्या उष्म्यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यातच तांत्रिक अडचणीमुळे या समस्येत भरच पडल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. सदर पाणी समस्येची दखल घेत ग्रा. पं. ने पाणीप्रश्न निकाली काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या मागणीची दखल घेत प्रशासनाने तांत्रिक अडचण दूर करून ऐन उन्हाळय़ात होणारी नागरिकांची भटकंती थांबवावी, अशी मागणीही सुज्ञ नागरिकांतून होत आहे.
प्रस्तावाला लवकरच मंजुरी
पाण्याच्या नवीन टाकीसाठी व पाईपलाईनसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव लवकरच मंजूर होईल. याबरोबरच ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.