(उद्या रविवारी गुरुपौर्णिमा. त्यानिमित्त…)
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया । चक्षुरुन्मीलितम् येन तस्मै श्रीगुरवे नम :।।
आषाढी एकादशीनंतर येणाऱया पौर्णिमेला भारतीय संस्कृतीत आगळेवेगळे महत्त्व आहे. हा गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरुशिष्य नात्याचे महत्त्व विशद करून सांगणारा. कसा असतो हा गुरु? वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अज्ञानरूपी अंधाराने आंधळा झालेल्याच्या डोळय़ात ज्ञानरूपी काजळकांडी घालून त्याचे डोळे उघडतात, अशा त्या गुरुना माझा नमस्कार असो. गुरु कधीही आपल्या शिष्याला चुकीचे मार्गदर्शन करीत नाही. त्याने करू नये. शिष्यही तितक्मयाच तोलामोलाचा असल्याशिवाय गुरु त्याला ज्ञान देत नाही. त्यापूर्वी तो त्यांच्या परीक्षेला उतरावा लागतो. त्यासंबंधीच्या कितीतरी पुराणकथा आहेत, अर्थपूर्णही आहेत.
एक छोटीशी कथा आहे. एका गुरुगृही काही विद्यार्थी ज्ञानार्जनाच्या इच्छेने आले. गुरु म्हणाले, एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच आश्रमात राहता येईल. कोणती परीक्षा?’ विद्यार्थ्यांनी विचारले. गुरुजी म्हणाले, ‘या टोपल्या घ्या, नदीवर जावून, त्यात पाणी भरून आश्रमातला घडा भरा.’ मुले टोपल्या घेऊन नदीवर गेली. टोपल्या वेताच्या होत्या. त्यांना फटी होत्या. टोपलीत पाणी काही भरेना. थोडेसे चालेपर्यंत टोपल्या रिकाम्या होत. मुले कंटाळली. त्यांनी काम अर्धवट सोडले. एकच मुलगा चिकाटीने काम करीत राहिला. 1-2 तासात टोपलीचा वेत फुगला. फटी बुजून गेल्या. टोपलीत पाणी न सांडता राहू लागले. विद्यार्थ्याला आनंद झाला. त्याने उत्साहाने भराभर नदीचे पाणी आणून घडा भरला. तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘हाच खरा माझा विद्यार्थी. यालाच मी ज्ञान देईन. कारण त्याने माझ्यावर विश्वास ठेवला, आज्ञापालन केले, चिकाटीने न कंटाळता पाणी भरत राहिला. म्हणजेच त्याच्याकडे ज्ञान मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे.’ हे सारे ऐकून इतर विद्यार्थी खजील झाले. त्यांना आपली चूक कळली. पूर्वी उपनयन संस्कार झाला की, 7-8 वर्षांचा विद्यार्थी गुरुगृही जाऊन, त्यांची सेवा करून ज्ञानार्जन करीत असे. 12 वर्षे इमाने-इतबारे विद्याग्रहण केल्यावर पुन्हा गुरु त्याची परीक्षा घेत आणि मग योग्य तो उपदेश करूनच त्याला घरी पाठवत. द्रोणाचार्यांनी सर्व कौरव-पांडवांचीही अशीच परीक्षा घेतली होती. झाडावरच्या पक्षाच्या डोळय़ात बाण मारायला सांगून! त्यात फक्त अर्जुन उत्तीर्ण झाला आणि तोच त्यांचा शिष्योत्तम ठरला…तर विद्याग्रहणानंतर त्याला गृहस्थाश्रमात प्रवेश करता येत असे. विद्यार्थी होण्यासाठीही 5 गुणांची आवश्यकता असते.
ज्ञानतृष्णा गुरौ नि÷ा सदाध्ययनदक्षता। एकाग्रता महत्वेच्छा विद्यार्थीगुणपञ्चकम्।।
ज्ञानाची तहान, गुरुवरील नि÷ा, अभ्यासाच्या बाबतीत नेहमी जागरुकता, एकाग्रता, महत्त्वाकांक्षा हे पाच गुण विद्यार्थ्याच्या अंगी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याची जशी पात्रता असते, तसाच गुरु त्याला लाभतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या अंगी जास्तीत जास्त सद्गुण बाणवण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे गुरुही लाभतात.
गुरु-शिष्य हे फक्त शाळेतच असतात असे नव्हे. तर जन्मलेले प्रत्येक मूल आपल्या आईवडिलांकडून काही न काही शिकत असते. त्यामुळे तेच त्याचे पहिले गुरु. त्यानंतर समाज, नातेवाईक, शेजारीपाजारी यांच्याकडूनही त्याला ज्ञान मिळते. व्यावहारिक, भावनिक ज्ञान असते ते. इतकेच नाही तर निसर्गातला प्रत्येक घटक, मग तो किडा मुंगी का असेना, त्यांच्याकडून काही न काही शिकण्यासारखे असतेच. म्हणूनच कित्येकांनी गुरुची थोरवी वर्णन केली.
गुरु ईश्वर तात माय, गुरुविण जगी अन्य काय। गुरवे नम:।। गुरु हा परमेश्वरापेक्षाही मोठा असतो. म्हणून तर दत्तात्रेयानीही अनेक गुरु केले. श्रीराम-वसि÷, श्रीकृष्ण -सांदिपनी, द्रोण-अर्जुन, चाणक्मय-चंद्रगुप्त हीच परंपरा अगदी अलीकडच्या काळात जनार्दनस्वामी-रामदास, रामदासस्वामी-कल्याण, ते अगदी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर-रमाकांत आचरेकर यांच्यापर्यंत. यादी केवढी तरी मोठी होईल. म्हणजेच गुरु-शिष्य परंपरा ही अशी प्राचीन काळापासून आजतागायत चालत आली आहे. चालत राहील.
भारतीय संस्कृतीत जी काही ऋणे मानली गेली आहेत, ती त्या त्या घटकांप्रति आपली कृतज्ञता प्रकट करणारी आहेत. मातृऋण, पितृ ऋण, गुरुऋण. ही तीन ऋणे आहेत, ती माणूस कधीही फेडू शकत नाही. पण आपल्याला ज्यांनी घडवले, त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता नक्कीच प्रकट करू शकतो. त्यासाठीच गुरुपौर्णिमेचा दिवस असतो. यालाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. व्यास हे साऱया जगताचे गुरु आहेत. प्राचीन भारतीय परंपरेतला हा शिक्षकदिनच आहे. व्यासांनी आपल्या वेदांची विषयानुसार विभागणी करण्याचे काम केले, जे अतिशय कठीण होते. महाभारतासारखा अजोड ग्रंथ लिहिला. अठरा पुराणे इ. ग्रंथांची निर्मिती केली. अफाट लेखनकार्य केले. साऱया जगाला अनमोल अशी शिकवण दिली. जगात असा कोणताही विषय नाही, ज्याला महामुनी व्यासांनी स्पर्श केला नाही. म्हणून तर व्यासोच्छिष्ट्म जगत्ससर्वम् असे म्हटले जाते. तसेच गुरुणां गुरुः म्हणजे गुरुंचेही गुरु असे त्यांचे वर्णन केले जाते. या पराशर व्यासांचे नावही समर्पक आहे. कारण व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंदबिंदुतून जाणारी व परिघाच्या दोन बिंदुना जोडणारी रेषा. सारे विश्व हे एक वर्तुळ मानले तर त्या अफाट वर्तुळाला व्यासांनी आपल्या प्रतिभेने स्पर्श केला आहे नि अफाट असे ज्ञान साऱया जगाला दिले. या वेदांचाच आधार घेऊन आज नासासारख्या अंतराळ केंद्रात संशोधन केले जाते, ह्यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे. या सर्वांचा एक भारतीय म्हणून आपल्याला अभिमानाच वाटायला हवा. मरेपर्यंत विद्यार्थी राहून मधुमक्षिकेप्रमाणे ज्ञानकण गोळा करायला हवेत. प्रत्येक ज्ञानदात्याचे आभार मानायला हवेत. एकाक्षरप्रदातारं यो गुरुं नाभिवन्दति। श्वानयोनिशतं भुक्त्वा चाण्डालेष्वभिजायते।। एक अक्षर जरी शिकवले तरी गुरुंना अभिवादन करावे. जो ते करत नाही, तो कुत्र्याचे शंभर जन्म भोगून चांडाळाच्या जन्माला जातो असा याचा अर्थ.
गुरुबद्दल आदर हा असलाच पाहिजे. गुरुची सेवा, शुश्रूषा हा शिष्याचा धर्म आहे. समर्थ रामदासांनी दासबोधात गुरुस्तवनासाठी स्वतंत्र समास लिहिला आहे. त्यात त्यांनी मंत्र गुरु, तंत्रगुरु, संगीत गुरु असे अनेक प्रकार सांगितले आहेत. शिक्षण हा संस्कार आहे. कोणतेही यंत्र गुरुची जागा घेऊ शकत नाही. ‘ये ह्रदयीचे ते ह्रदयी’ घालण्याचे काम यंत्र करू शकत नाही. म्हणूनच गुरुचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा याप्रसंगी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत मनोभावे प्रार्थना करू या, गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरु: साक्षात् परब्रम्ह: तस्मै श्रीगुरवे नम:।।
अनुराधा दीक्षित, वाडा, देवगड