प्रतिनिधी / बेळगाव
सर्वसामान्य जनतेला वेळेत सात-बारा उतारा उपलब्ध व्हावा, याकरिता जनस्नेही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, बहुतांश केंदे तांत्रिक अडचणींमुळे सुरळीत सुरू नसतात. परिणामी तहसीलदार कार्यालयात उतारे मिळविण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी होत आहे. उतारे वेळेत मिळत नसल्यामुळे नागरिकांना हलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे इतरत्र ठिकाणी असलेली जनस्नेही केंदे सुरळीत सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.
शेतकऱयांना पीककर्ज, कृषी अनुदान, अवजारे, बी-बियाणे, खते, जमीन खरेदी-विक्री आदी कारणांसाठी सात-बारा आवश्यक आहे. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी तहसीलदार कार्यालयात वर्दळ वाढली आहे. सात-बारा मिळविण्यासाठी 30 ते 40 किलोमीटरहून सर्वसामान्य नागरिक येत असतात. मात्र, वेळेत उतारे मिळत नसल्यामुळे संबंधितांचे हाल होत आहेत. शिवाय नागरिकांना दिवसभर रांगेत थांबावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, एकीकडे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मात्र तहसीलदार कार्यालयात होणारी गर्दी चिंतेची बाब ठरत आहे. शासकीय कागदपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाने सांबरा, काकती, उचगाव, एपीएमसी मार्केट यार्ड आदी भागात जनस्नेही केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, यातील बहुतांशी केंद्रे सर्व्हरडाऊन, विद्युत पुरवठा खंडित व इतर अडचणींमुळे बंद असतात. त्यामुळे नागरिकांना तहसीलदार कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. शेतकऱयांना वेळेत शासकीय कागदपत्रे मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जनस्नेही केंद्रांचे काम सुरळीत सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.