कपिलेश्वर रोड परिसरातील समस्या निवारणाकडे दुर्लक्ष : सांडपाण्याच्या निचऱयासाठी गटारी-डेनेज वाहिनीच्या दुरुस्तीची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी एक हजार कोटीचा निधी विविध विकासकामे राबविण्यासाठी खर्च करण्यात आला आहे. मात्र काही भागातील समस्या जैसे थे आहेत. तांगडी गल्ली, कपिलेश्वर रोड परिसरातील समस्यांबाबत महापालिका आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही निवारण झाले नाही. त्यामुळे हा परिसर समस्यांच्या विळख्यात अडकल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध विकासकामे राबविण्याकरिता एक हजार कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र काही भागातील समस्यांचे निवारण करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. कपिलेश्वर रोड परिसरातील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पण येथील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक असलेल्या गटारींची आणि डेनेज वाहिनीची दुरुस्ती केली नाही. उड्डाणपुलाच्या बांधकामानंतर समस्यांचे निवारण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण अजूनही या समस्यांचे निवारण झाले नाही. परिणामी प्रत्येक पावसाळय़ात कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, भांदूर गल्ली कॉर्नर, रामा मिस्त्री अड्डा अशा विविध परिसरात पावसाचे पाणी साचत असते. गटारींचे बांधकाम व्यवस्थित करण्यात आले नाही. परिसरात डेनेज वाहिन्यादेखील व्यवस्थित नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. याबाबत महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. पण दखल घेण्यात आली नाही.
प्रत्येक पावसाळय़ात पाणी साचून घरांमध्ये शिरत असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे गटारींचे बांधकाम करावे, अशी मागणी आमदारांकडे करण्यात आली. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कपिलेश्वर रोड शेजारी तांगडी गल्लीच्या कोपऱयावर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. हा ट्रान्सफॉर्मर उच्चदाबाचा असूनही डीपी उडय़ावर ठेवण्यात आली आहे. विद्युत पुरवठय़ाच्या डीपीमधील फ्युज जळाल्याने वायर घालण्यात आल्या आहेत. पण डीपीचे दरवाजे नेहमी उघडेच असतात. लहान मुलांना किंवा रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱया नागरिकांना धोकादायक बनले आहे. या ठिकाणी लहान मुले खेळत असल्याने धोका अधिक आहे. त्यामुळे डीपीचा बंदोबस्त करावा, अशी मागणीदेखील करण्यात आली होती. पण याकडेही हेस्कॉमने दुर्लक्ष केले आहे. येथील समस्यांची पाहणी करून तातडीने निवारण करावे, अशी मागणी कपिलेश्वर रोड परिसरातील रहिवासी करीत आहेत.