मुंबई \ ऑनलाईन टीम
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाल्याकडे लक्ष वेधलं आहे. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या ट्वीटवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सलग सहा ट्वीट करत जोरदार पलटवार केला आहे.
अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते
“अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल,” अशी टीका धनंजय मुंडे यांनी ट्विट करत केली आहे.
अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे
बीड जिल्ह्यात सध्या दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत. तसेच हा स्टॉक संपायच्या आत आणखी दोन दिवसांनी पुढील स्टॉक येईलच, हेही काहींना माहीत नसावं. पण आपल्या अचानक आलेल्या जागृतीतून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा परिणाम लसीकरण प्रक्रियेवर देखील होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 6800 व कोव्हॅक्सिनचे 13290 डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडीसीवर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
ताई साहेब….आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! असेही ट्वीट धनंजय मुंडेंनी केले आहे.
राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको
जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून 149473 नागरीकांना पहिले तर 19732 नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत.हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे तिथं नको.
कोव्हॅक्सिनच्या नव्याने प्राप्त 2 लाख लसींचा वितरणासह शिल्लक असलेल्या व आवश्यक असलेल्या लसींची सविस्तर आकडेवारी आपल्यासाठी देत आहे! आपण शेअर केलेल्या 20 लसींच्या यादीत जालना-सोलापूर शून्य आहे,आरोग्यमंत्री स्वतःच्या जिल्ह्यात लस मिळवू शकले असते हा साधा प्रश्न आपल्याला पडू नये? असा सवालही धनंजय मुंडेंनी केला आहे.
पंकजा मुंडे यांनी पत्रात नेमके काय म्हटलंय ?
“रेमडेसिवीरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे लस मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असे ट्वीट पंकजा मुंडेंनी केले होते. या ट्वीटवरुन त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.