वार्ताहर / देवराष्टे
दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेच्या यंदाच्या दोन आवर्तनासाठी 2.11 टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून ऊचलले असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. आज दुपारी योजनेचे दुसरे आवर्तन बंद करण्यात आले. तर तिसरे आवर्तन पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. ताकारी योजनेच्या माध्यमातून कडेगाव, पलुस, खानापुर, तासगाव, मिरज आदी तालुक्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षी ताकारी चे पहिले आवर्तन 27 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आले. या आवर्तनासाठी 1.3 टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून ऊचलण्यात आले. तर योजनेचे दुसरे आवर्तन 7 मार्च रोजी सुरू करण्यात आले. यासाठी 1.8 टीएमसी इतके पाणी कृष्णा नदीतून ऊचलण्यात आले. योजनेसाठी कोयना धरणातील 9.34 टीएमसी पाणीसाठा राखीव आहे.