होळीच्या निमित्ताने गावी गेले होते. अचानक आमच्या मॅडमची भेट झाली. शिक्षक-विद्यार्थी हे नातेच खूप वेगळे असते. खूप वर्षांनतर झालेल्या या भेटीचा आनंद विलक्षण होता. भरभरून बोलण्यामध्ये तासभर कसा गेला कळलेही नाही.
‘कशा आहात मॅडम?’
‘अगदी छान आहे गं.. तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. वर्षभरानंतर कोरोना आला. दीड वर्ष तसं घरातच गेलं पण काहीतरी सुरू असतं बघ! मधेच लेकाकडे जाते पुण्याला. मुलगा-मुलगी दोघेही तिकडेच राहतात. मी तशी निवांत आहे आता, परंतु सून-मुलगा, लेक आणि नातवंडे यांचे करिअरचे जिने चढताना होणारी कसरत, आताचा बोकाळलेला ‘मार्क्स’वाद, प्रचंड धावपळ, सारं असूनही आनंद घ्यायला वेळ नाही अशी स्थिती पाहिली ना की खरंच प्रश्न पडतो खरी स्वस्थता हरवत चालली आहे का? हा काळ बदलणं शक्मय नाही हे मलाही ठाऊक आहे गं, पण धावती पिढी पाहिली की खरंच टेन्शन येतं. कारणे काहीही असोत पण ताण तणाव आणि संघर्षाला तोंड देताना माणसाची स्वास्थ्याशी फारकत होताना दिसते आहे बघ.’
‘हो. मॅडम, खरं आहे.’
आज तीव्र स्पर्धेच्या आणि गतिमान जीवनात ‘ताण’ हा शब्द परवलीचा झाला आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत तो सावलीसारखा प्रत्येकासोबत पहायला मिळतो. ताणतणाव हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करता आले नाही तर शारीरिक, मानसिक स्तरावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून आजच्या काळात ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ अर्थात ‘ताण व्यवस्थापन कौशल्य’ आत्मसात करून तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवणे ही काळाची गरज बनली आहे.
सोप्या शब्दात सांगायचे तर ताण म्हणजे एक प्रकारचा मानसिक दबाव, दडपण वा भार. एक प्रकारची असुखकारक भावना. दडपणाची जाणीव ठेवणारी आणि शारीरिक आणि मानसिक थकवा आणणारी भावना असे म्हणता येईल. ‘ताण’ हा रोग नाही तर ती एक ‘अवस्था’ आहे. मात्र ताणाचे प्रमाण, तीव्रता आणि कालावधी जर जास्त असेल तर मात्र ते विविध रोगांना आमंत्रण ठरू शकते.
परीक्षा, अभ्यास, करिअर, नोकरी-व्यवसाय, नाती, कौटुंबिक जीवन, शारीरिक विकासाचे वेगवेगळे टप्पे, त्या-त्या टप्प्यांमध्ये उद्भवणाऱया विविध समस्या यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच ताणतणावाला सामोरे जावे लागते.
तसे पहायला गेले तर कुणाचेही आयुष्य ताणविरहित नसतेच परंतु त्याचे प्रमाण किती आहे यावर बऱयाच गोष्टी अवलंबून असतात. खरंतर गतीसाठी थोडा ताण आवश्यकही आहे. परंतु, त्याचे प्रमाण योग्य असायला हवे. ताण ‘मिठा’सारखा किंवा मिठाएवढाच हवा. अगदी आवश्यक तेवढाच.. पहा हं, भाजीमध्ये मीठ अजिबात नसेल तर भाजी बेचव लागेल आणि मीठ जास्त झाले तर ती खाणेही अवघड होऊन जाईल. अगदी तसेच. अजिबात ताण नसेल तर ‘बेफिकीर’ असण्याच्या दिशेने आपला प्रवास होईल. योग्य ताण योग्य गती देईल. ताणाचे प्रमाण जास्त झाले तर मात्र ‘विकारांचे अनेक ब्रेक’ आपल्या जीवनाची गती संथ करतील. त्यामुळे मनात येणारे विचार, निर्माण होणारा ताण, भावभावना, बदलते रंग, आपले मानसिक आरोग्य याविषयी आपण प्रत्येकाने सजग असणे गरजेचे आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ताणाची असंख्य कारणे सांगता येतील परंतु आपण या ताणतणावाशी कसे सामोरे जाऊ शकतो हे पाहणे जास्त गरजेचे आहे. त्यासाठी आत्मपरीक्षण करत आपले विचार, भावना, मूल्य, धारणा, दृष्टिकोन तपासून पाहणे आणि गरजेनुसार त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण कधी कधी अगदी क्षुल्लक गोष्टींना खूप महत्त्व देतो. खरं पाहिले तर या गोष्टी इतर अनेक समस्यांच्या तुलनेत अगदीच क्षुल्लक असतात. म्हणजे पहा हं, ‘आपण सकाळी ऑफिसला निघालोय. रस्त्यावरच्या गर्दीतून गाडी घेऊन आपण पुढे सरकत असतो, अगदी काळजीपूर्वक. एखादा माणूस अचानक पाठीमागून येतो आणि जोरजोरात हॉर्न वाजवून मधेच गाडी घुसवतो. त्याच्या या कृतीने तो त्याला आणि आपल्यालाही धोक्मयात आणतो अर्थात त्यामुळे त्यावेळी आपल्याला राग येतो. ‘तो राग येणे अगदी साहजिक आहे’ असे स्वतःचेच आपण समर्थन करतो, त्याला काही सुनावतोही परंतु ते तिथेच संपत नाही. घटना तर घडून गेली परंतु मनात स्वगत सुरूच असते. दीड शहाणा कुठला. आम्ही काय मूर्ख आहोत म्हणून शिस्तीत चाललो होतो. स्वतःही धडपडायचे आणि दुसऱयालाही खड्डय़ात लोटायचे. अख्खा दिवस खराब केला. कितीतरी वेळ आतल्या आत आपण बोलत राहतो, ऑफिसला गेल्यावर सहकाऱयांजवळही याची चर्चा होते. नंतर घरी गेल्यावर आपण अशा बेदरकार वाहनचालकांवर ताशेरेही ओढतो. बराच काळ त्याच घटनेत घोळत राहतो. काहीवेळा त्या ताणांचा परिणाम म्हणून चिडचिड होते. विनाकारण आपला पारा चढतो. ‘वडय़ाचे तेल वांग्यावर’ अशीही काहीशी स्थिती होते.
ही सर्व घटना नीट पाहिली तर लक्षात येईल की अचानक मध्ये वाहन आल्याने ‘तणावात गेलेला त्यावेळचा तो क्षण’ तिथेच संपला नाही तर तो तणाव पुढे संध्याकाळपर्यंत आपल्या मनात बाळगला गेला. परिणामी आपल्यालाच त्रास झाला आणि त्रास होण्यापलीकडे त्यातून निष्पन्न काहीच झाले नाही. त्यावेळी धोका टळला, सुटलो म्हणून ते सोडून दिले असते तर इतका वेळ अस्वस्थतेचा सामना करावा लागला नसता.
दृष्टिकोनात थोडा बदल करून विचार केला की आपण आतून शांत होतो आणि अशा पद्धतीच्या अगदीच छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून निर्माण होणाऱया ताणापासून स्वतःला बाजूला करू शकतो.ज्यावेळी आपल्यासमोर समस्या असतात, नावडते क्षण असतात त्यावेळी जादूची कांडी फिरावी आणि ते क्षण पटकन् नाहीसे व्हावेत असे वाटते आणि ज्यावेळी आपण आनंदी असतो त्यावेळी हे क्षण संपूच नयेत असेही वाटते. परंतु एक लक्षात घ्यायला हवे की, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे टप्पे येतच असतात. अगदी हताश होणे किंवा बारीक सारीक गोष्टींवर राग धरणे, रुसणे, अबोला धरणे, आपणहून मानसिक ताण ओढवून घेणे, दुसऱयाला मनस्ताप देणे हे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा.
मुळातच ताण कमी करण्यासाठी तो नेमका का उत्पन्न झाला आहे याचा प्रामाणिक विचार करून त्यासाठी काय बदल करणे गरजेचे आहे तशी कृती करायला हवी. अर्थात त्यासाठी मुळात ताणाचे प्रमाण कळणे आवश्यक आहे. तसे केले तर नेमकी गल्लत कुठे होते आहे, ताणाची स्थिती का निर्माण होते आहे हे आपल्या लक्षात यायला मदत होईल आणि ताण कमी करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याचीही जाणीव होईल. संपूर्णतः ताणविरहित असे कुणाचेही आयुष्य नसते. परंतु जशी पंख्याची गती आपण आपल्याला सुसह्य असेल तशी ठेवतो तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या ताणाच्या बाबतीतही करता यायला हवे. यासाठी काय काय करता येईल याविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात.
-ऍड. सुमेधा संजीव देसाई