कोरोनावरील लसीसंबंधी ‘एम्स’ संचालकांकडून स्पष्ट संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा संसर्ग सध्या नियंत्रणात आला असला तरी अद्यापही पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. सध्या देशात अजूनही दिवसभरात 35 ते 40 हजार नवे रुग्ण सापडत असल्याने धोका कायम आहे. संसर्ग नियंत्रणात येण्यासाठी लस येण्याची आवश्यकता असून तातडीच्या वापरासाठी चालू महिन्यातच मान्यता देण्यात येणार असल्याचे संकेत ‘एम्स’च्या संचालकांकडून देण्यात आले. डिसेंबर अखेरपर्यंत कोणत्याही लसीला मान्यता मिळाल्यास नव्या वर्षाच्या प्रारंभीच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तातडीच्या स्वरुपात प्रत्यक्ष लसीकरण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी माहिती दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना गुरुवारी दिली. भारतात सध्या सहा लसींवर काम सुरू आहे. यांपैकी दोन लसींची अखेरच्या टप्प्यातील चाचणी पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. त्यादृष्टीने कंपन्यांनी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज केला असून पुढील प्रक्रियेसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
कोणत्याही लसीला अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर सार्वजनिक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लसीकरण आणि इंजेक्शन्सच्या उपलब्धतेसंदर्भात अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये योग्य समन्वय राखणेही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाचण्या समाधानकारक
भारतातील आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये सर्व निकाल अपेक्षेप्रमाणे आले आहेत. सुरक्षा आणि प्रभावशीलतेशी कदापि तडजोड करण्यात आलेली नाही. 70,000 ते 80,000 स्वयंसेवकांना लस देण्यात आल्या आहेत. यांपैकी कोणावरही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. याचाच अर्थ आपल्या लसी प्रभावशाली असल्याचे स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरण सुरू होताच संसर्ग नियंत्रणात
लसीचा प्राधान्यक्रम ठरविणेही महत्त्वाचे असून कोविडमुळे मृत्यूची शक्मयता असलेल्यांना पहिल्या टप्प्यात लस देणे गरजेचे वाटते. वृद्ध, अन्य आजारांनी पीडित आणि सर्वात पुढच्या फळीत काम करणाऱया कामगारांना पहिल्यांदा लस देणे अत्यावश्यक आहे. ही लस मिळाल्यानंतर ती शरीरात चांगल्याप्रकारे अँटिबॉडिज तयार करण्यास सुरुवात करते. अनेक महिने यापासून सुरक्षितता मिळते. तोपर्यंत विषाणूच्या संक्रमितांची संख्या कमी होऊन कोरोना संकटावर मात करण्यास मोठी मदत होईल, असे सांगण्यात आले.