प्रतिनिधी / बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वेगेट ते यश हॉस्पिटलपर्यंतच्या मार्गावर सांडपाणी रस्त्यावर साचू लागले आहे. डेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहून जात आहे. याचा फटका स्थानिक रहिवासी व व्यापाऱयांना बसू लागला आहे. मागील दीड महिन्यांपासून ही समस्या निर्माण झाली असून मनपाने याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात काँक्रीटचे रस्ते करण्यात आले, मात्र ते आता तापदायक ठरत आहेत. सांडपाण्याचे नियोजन नसताना काँक्रिटीकरण करण्यात आल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेटजवळील नागरिकांकडून मागील 20 वर्षांपासून ड्रेनेज पाईप घालण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु त्यांची मागणी विचारात न घेताच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे आता या परिसरातील रहिवाशांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
विहिरींचे पाणी दूषित मागील दीड महिन्यांपासून डेनेज चेंबर ब्लॉक झाल्याने सांडपाणी बाहेर पडू लागले आहे. हे पाणी थेट आसपासच्या विहिरींमध्ये मिसळत असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे वापरात असलेले पाणी आता वापराविना पडून आहे. दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे चेंबरची दुरुस्ती करून या परिसरात नवीन डेनेज वाहिनी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.