नागरिकांना करावा लागतोय पर्यायी मार्गाचा वापर
प्रतिनिधी/ बेळगाव
मिरज ते लोंढा या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. यासाठी शनिवारपासून तीन दिवस तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळपासून या मार्गावरील वाहतूक बंद करत जेसीबीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
यापूर्वी रेल्वेसाठी एक ट्रक उपलब्ध होता. परंतु क्रॉसिंगमुळे रेल्वेचा वेळ वाया जात असल्यामुळे दुपदरीकरण केले जात आहे. रेल्वेस्थानकापासून दुसरा ट्रक घातला जात आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने प्राथमिक काम केले जात आहे. पहिले रेल्वेगेट येथील टॅक घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता तानाजी गल्ली येथील रेल्वेगेटचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी शनिवारपासून सोमवारपर्यंत तीन दिवस रेल्वेगेट बंद ठेवले जाणार आहे.
शनिवारी सकाळी रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला. त्यानंतर जेसीबीने कामाची सुरुवात करण्यात आली. येत्या दोन दिवसात ट्रक घातला जाणार आहे. रेल विकास निगमच्या माध्यमातून हे काम पूर्ण केले जात आहे. यासाठी आवश्यक मशिनरी रेल्वे ट्रकजवळ आणण्यात आली आहे.
नागरिकांची होतेय गैरसोय
शनिवारी आठवडय़ाचा बाजार असल्याने शहरात येणाऱयांची संख्या अधिक होती. त्यातच तानाजी गल्ली रेल्वेगेट बंद असल्यामुळे सर्व भार हा कपिलेश्वर ओव्हरब्रिजवर पडला. यामुळे सकाळी व संध्याकाळच्या सुमारास शनिमंदिर कॉर्नरजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड येथील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज ओव्हरब्रिज व कपिलेश्वर ओव्हरब्रिजचा वापर करावा लागला. फिरून जावे लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती.