गड आला पण सिंह गेला…!
शूर लढवय्या योद्धा तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त…
आपल्या वयाच्या अवघ्या 16 व्या वषी निवडक मावळय़ांना सोबतीला घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणाऱया शिवाजी महाराजांचा एक एक मावळा सुद्धा तितकाच झुंजार, शूरवीर, बलाढय़, कर्तृत्त्ववान, विश्वासू, प्रामाणिक आणि प्रचंड ताकदीचा लढवय्या सैनिक होता.
ज्या प्रमाणे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा शिवाजी महाराजांनी घेतली होती त्याच प्रमाणे त्यांच्या समवेत असलेला प्रत्येक मावळा स्वराज्य स्थापन करण्याकरता प्राणपणाने लढला. त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मावळय़ांमध्ये मौल्यवान हिऱयाप्रमाणे लढणारे एक पराक्रमी योद्धा म्हणजे तानाजी मालुसरे होत. तानाजी मालुसरे याचं बालपण सातारा जिह्यात जावळी तालुक्मयातील गोडोली नावाच्या लहान गावात गेलं.
तानाजींचा पराक्रम
अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू सरदारांना अफजल खानावर तुटून पडण्याकरता हजार मावळय़ांचे सैन्य दिले होते. या मोहिमेत तानाजी मालुसरेंनी सैन्याच्या बरोबरीने लढत खानाच्या फौजेचा फज्जा उडविला.
शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात, रायगडालगत कोकण येथे तिथल्या दंगलखोर जमातींनी जो उच्छाद मांडला होता, त्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी तानाजींवर सोपविली. तेव्हा तानाजी मालुसरे तिथल्या उमरठे या गावी वास्तव्याला राहिले व त्या लोकांशी आपलेपणाने संबंध प्रस्थापित करून स्वराज्याच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेतलं.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर आणि लढवय्ये सैनिक होते ज्यांनी महाराजांच्या आज्ञेखातर अगदी हसत हसत कोंढाणा मिळवण्याकरता जीवाची बाजी लावली असती. पण ज्याक्षणी या मोहिमेचा विचार महाराजांच्या मनात आला तेव्हा त्यांच्या नजरेसमोर एकाच पराक्रमी योध्याचा चेहरा आला ‘वीर तानाजी मालुसरे’.
महाराजांनी ज्यावेळी किल्ले घेण्याची मोहीम राबविली त्यात तानाजी मालुसरे हे सर्वात आघाडीवर होते. ऐतिहासिक अशा अफजलखानाच्या वधाच्या वेळी देखील त्यांनी आपला पराक्रम दाखविला होता. ज्यावेळी महाराज आपल्या 10 ते 12 विश्वासू साथीदारांसमवेत शाहीस्तेखानावर हल्ला करण्याकरता लाल महालात घुसले तेव्हा देखील त्या साथीदारांमध्ये तानाजी मालुसरे त्यांच्या समवेत होते. महाराजांनी दरवेळी तानाजींचा पराक्रम अगदी जवळून पाहीला होता.
कोंढाणा मिळविण्याची मोहीम तानाजी फत्ते करू शकतात याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. या मोहिमेकरता महाराजांनी तानाजी मालुसरेंना तातडीचे बोलावणे धाडले त्यावेळी तानाजी उमरठे गावी आपला मुलगा रायबाच्या लगीनघाईत व्यस्त होते. पण महाराजांनी बोलावले म्हटल्यावर हातातली सगळी कामं सोडून तानाजी महाराजांची भेट घेण्याकरता आधी गडावर पोहोचले.
आधी लगीन कोंढाण्याचे
महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना सांगितला तो ऐकून तानाजी कृतकृत्य झाले. या मोहिमेकरता महाराजांनी आपला विचार केला यासारखे भाग्य काय असू शकते या विचाराने त्यांना धन्य झाल्यासारखे वाटले. यावेळी तानाजींसोबत त्यांचे बंधू सूर्याजी आणि शेलारमामा देखील होते. मोहीम समजल्यानंतर शेलारमामा तानाजींना म्हणाले ‘लगीन उरकून घेऊ आणि निघू’. परंतु त्यावर तानाजी लगेच उद्गारले, “आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे’’
तानाजींनी कोंढाण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि रायबाच्या लग्नाची जवाबदारी महाराजांवर सोपवत ‘जर परत आलो तर रायबाचे लगीन लाऊन देईन अनं जर का मेलो तर तुमी त्याचं लगीन लाऊन द्या’ असं म्हणत महाराजांचा निरोप घेतला.
मोहीम फत्ते
तानाजी मालुसरे हे बारा हजार पायदळ सैनिकांचे सुभेदार होते. तानाजी 4 फेब्रुवारी 1670 साली माघ वद्य अष्टमीला रात्री आपल्या मराठा सैन्यासमवेत गुंजवणी नदी ओलांडून कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले. या गडावर अत्यंत शूर असा मूळ राठोड राजपूत असलेला उदयभान नावाचा सरदार तैनात होता. त्याच्या नेतृत्वातील राजपूत सैन्य त्यावेळी गडावर तैनात होते.
अंधारी रात्र होती तानाजी गडाच्या पायथ्याशी आपल्या सैन्यासह योग्य वेळेची वाट बघत होते. गड सर करण्याकरता तानाजींनी शत्रू विचार देखील करणार नाही असा द्रोणागीरीचा कडा निवडला. आपल्या यशवंती घोरपडीच्या कमरेला साखळी बांधली आणि तिला उंच कडय़ावर फेकले. ते आपल्या सैन्यासह किल्ल्यात प्रवेश करते झाले आणि त्याक्षणी शत्रूवर तुटून पडले. पुण्याच्या दिशेने उघडणाऱया दरवाजावर आपले सैन्य असेल म्हणून आधी त्या दिशेने जाऊन त्यांनी पहारेकऱयांवर हल्ला चढविला आणि त्यांना संपविले.
सिद्दी हलाल हा गडाचा सरनोबत आधी तानाजीला सामोरा गेला. तानाजी आणि सिद्दी हलाल यांच्यात तुंबळ युद्ध पेटले आणि तानाजींनी त्याला आडवा पाडला. उदयभानने तानाजींवर हल्ला केला. उदयभानाच्या जोरदार हल्ल्याने तानाजींच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या. तरीदेखील हातावर शेला बांधून ते त्यावर त्याचे वार झेलत होते. त्याच्या हल्ल्याने तानाजींची ढाल तुटली. ते रक्तबंबाळ झाले. परंतु त्याचे वार ते आपल्या हातावर झेलत होते. त्यांचा हा पराक्रम जणू नियतीला देखील बघवला नाही व उदयभानच्या झालेल्या जबरदस्त हल्ल्याने ते धारातीर्थी कोसळले.
मृत्यूला सामोरं जाताना सुद्धा त्यांनी असंख्य शत्रूंना यमसदनी धाडले व आपल्या मराठा सैन्याला वाट मोकळी करून दिली. तानाजींना पडताना पाहून 80 वर्षांच्या शेलारमामांनी आपले धैर्य खचू न देता नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली. शत्रूशी लढता लढता कल्याण दरवाज्याजवळ पोहोचत तेथील पहारेकऱयांना कापून काढले आणि आपल्या सैन्याकरता त्यांनी तो दरवाजा उघडला. अवघ्या एका रात्रीत मराठा सैन्याने कोंढाणा हे स्वराज्याचे मूल्यवान रत्न आपल्या ताब्यात मिळवलं.
जिजाबाईंना आणि महाराजांना खूप आनंद झाला. आपला पराक्रमी धाडसी लढवय्या तानाजी या मोहिमेत धारातीर्थी पडल्याचे ऐकून त्यांना अतीव दुखः झाले. ते ऐकताच ऐतिहासिक उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. ते उद्गारले ‘गड आला पण सिंह गेला’.