पलानिसामी, स्टॅलिन अन् कमल हासन यांच्यावर नजर केंद्रीत
तामिळनाडूच्या सर्व 234 विधानसभा मतदारसंघांमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणात नेहमीच चेहरा महत्त्वाचा ठरतो, कारण येथे नेता असो किंवा अभिनेता प्रत्येकाच फॅन फॉलोइंग अत्यंत महत्त्वाची असते. अशा स्थितीत तामिळनाडूत कुठला चेहरा सर्वात मोठा सुपरस्टार होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ई. पलानिसामी
मुख्यमंत्री असल्याने प्रत्येकाची नजर ई. पलानिसामी यांच्यावर लागून राहिली आहे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षातील कलह संपवून सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करणे हेच पलानिसामी यांचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. लोकप्रियतेत जयललितांची बरोबरी करू शकत नसले तरीही पलानिसामी हेच पक्षाचे सर्वात मोठे चेहरे आहेत. अशा स्थितीत स्वतः विजय मिळविण्यासह पक्षाला सन्मानजक आकडय़ापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आहे.
ओ. पन्नीरसेल्वम
जयललितांचे निधन झाल्यावर ओ. पन्नीरसेल्वम यांनाच त्यांचेच उत्तराधिकारी मानले जात होते. प्रारंभीच्या काळात अशीच स्थिती होती. पण पक्षात कलह सुरू झाल्यावर त्यांना मागे हटावे लागेल. पक्षात ते मोठया पदावर राहिले, उपमुख्यमंत्री झाले पण अद्याप पक्ष कार्यकर्त्यांवरील त्यांची पकड कायम आहे. अशा स्थितीत सत्तारुढ पक्षात ओ. पन्नीरसेल्वम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे.
एम.के. स्टॅलिन
द्रमुक प्रमुख आणि या निवडणुकीतील सर्वात मोठे चॅलेंजर एम.के. स्टॅलिन पहिल्यांदाच एम. करुणानिधी यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सत्तेत पुनरागमन, पक्ष मजबूत करण्यासारखी अनेक आव्हाने स्टॅलिन यांच्यासमोर आहे. मतदानपूर्व सर्वेक्षणात स्टॅलिन हे मुख्यमंत्रिपदाचे सर्वात लोकप्रिय उमेदवार असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे.
कमल हासन
अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात दाखल झालेले कमल हासन लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून राजकारणात सक्रीय आहेत. राजकारणात कुठल्याही पदासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडूत एखादा सुपरस्टार सत्तेचा मानकरीही ठरत असल्याचा इतिहास राहिला आहे. कमल हासन यांचा पक्ष स्वबळावर बहुमत मिळवू शकणार नसला तरीही राजकारणाची लढाई लांबल्यास कमल हासन मोठा फॅक्टर ठरू शकतात.
टीटीव्ही दिनाकरन
जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकमध्ये अनेक गट निर्माण होऊ लागल्यावर सर्वात मोठे नाव शशिकला यांचेच होते. शशिकला यांना त्यानंतर तुरुंगवास झाला तर त्यांचे पुतणे टीटीव्ही दिनाकरन यांनी सुत्रे हाती घेतली. अण्णाद्रमुकमध्ये फारसे न चालल्याने त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. सद्यस्थितीत काही क्षेत्रांमध्ये दिनाकरन यांचा प्रभाव आहे. अशा स्थितीत ते राजकारणातील महत्त्वाचे चेहरे ठरू शकतात.