चेन्नई / वृत्तसंस्था
बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाने गुरुवारी तामिळनाडूतील किनारपट्टीच्या जिल्हय़ांमध्ये थैमान घातले. सायंकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूत 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. तर, आंध्रप्रदेशात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे एकाचा बळी गेला आहे. दरम्यान, पाँडिचेरीच्या काही भागालाही वादळाचा फटका बसला असून मोठय़ा प्रमाणात पडझड झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत धोकादायक चक्रीवादळाने पाँडिचेरीच्या किनाऱयाला ओलांडले असून आता ते सौम्य झाले आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या अधिकाऱयांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी भागातून सव्वादोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. स्थलांतरितांमध्ये 40 हजारहून अधिक मुलांचा समावेश असून सर्वांना निवारा छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. बुधवारपासून येथे सुरू झालेल्या पावसामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
पाँडिचेरीमध्ये पावसाचा जोर कायम
पाँडिचेरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. चक्रीवादळ 25 नोव्हेंबरला रात्री 11.30 पासून 26 नोव्हेंबरला पहाटे 2.30 च्या दरम्यान पाँडिचेरीच्या किनाऱयावर थडकले. मात्र, त्यानंतर चक्रीवादळ कमकुवत झाले. पुढील 3 तासात त्याचा वेग मंदावला आणि 65-70 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत होते, अशी माहिती देण्यात आली. तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या किनाऱयावर तटरक्षक दलाच्या 8 बोटी आणि 2 विमाने तैनात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे व्यापारी बोटी तसेच मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या काही भागात बुधवारी जोरदार वाऱयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तामिळनाडूत बुधवारी मध्यरात्रीच तीव्र चक्रीवादळ किनाऱयावर आदळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे रक्षण करण्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी चेन्नई, वेल्लोर, कुडलोर, विलुपुरम, नागापट्टिनम, तिरुवारूर, चेंगलपेट, कांचीपुरम यासह 13 जिल्हय़ांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती.
चेन्नई विमानतळही बंद करण्यात आले आहे. निवार चक्रीवादळाच्या परिणामी चेन्नईत मागील 24 तासात पाऊस पडत आहे. अनेक भागात पाणी साचले असून माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या निवासस्थानातही पाणी भरले. 2015 साली निर्माण झालेल्या पूरस्थितीतून धडा घेत चेन्नई प्रशासनाने 90 टक्के भरलेल्या चेंबरमबाक्कम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पुंद्रातूर, सिरुकलाथूर, तिरुमुडिवक्कम आणि तिरुनीरमलईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अन्य राज्यांवरही परिणाम
‘निवार’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्रप्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागातही वातावरणात प्रभावी बदल दिसून आले. काही ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टीही झाली. त्याचबरोबर उत्तरेकडील जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये वाऱयाचा वेग कमी झाल्यामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे आणि गंभीर गटात पोहोचली आहे.
पंतप्रधान-गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू व पाँडिचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी सखल भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या असून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.