वृत्तसंस्था/ चेन्नई
देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना तामिळनाडूत प्राचीन आयुर्वेद उपचार पद्धत ‘सिद्धा’द्वारे या जीवघेण्या विषाणूवर मात देण्याचा दावा केला जात आहे. तामिळनाडूत कोरोनाबाधितांचे प्रमाण 64 हजारांपेक्षा अधिक झाले आहे. कोरोनाचे लक्षणरहित आणि सौम्यलक्षणे दिसून येणारे रुग्ण या उपचारातून 100 टक्के बरे झाल्याचा दावा राज्याच्या मंत्र्याने केला आहे.
सौम्य लक्षणे असणाऱया बाधितांवर सिद्धउपचार 100 टक्के प्रभावी ठरल्याचे तामिळनाडू सरकारने म्हटले आहे. सिद्धउपचार 100 टक्के यशस्वी ठरत आहे. आम्ही कुठल्याच रुग्णाचा जीव धोक्यात आणत नाही आहोत. आम्ही सिद्धा, योग आणि आयुर्वेदाच्या मिश्रणाचा प्रयोग करत आहेत. या उपचाराची पुष्टी केली नसली तरीही याचा एक इतिहास राहिला आहे. लोकांचा यावर विश्वास असल्याचे राज्याचे मंत्री के. पंडय़ाराजन यांनी म्हटले आहे.
एका महाविद्यालयात अनुमती
चेन्नईमध्ये 25 रुग्ण संसर्गमुक्त झाल्यावर राज्य सरकारने सिद्धउपचाराला कोरोना विषाणू संसर्गाचा हॉटस्पॉट ठरलेल्या व्यासरपदी येथील आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालयात अनुमती दिली आहे. व्हेंटिलेटर आणि प्राणवायू सहाय्यावर असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धत नसल्याचे पंडय़ाराजन यांनी सांगितले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येणाऱया रुग्णांवरच सिद्धउपचाराची अनुमती दिली जात आहे. या उपचारपद्धतीची कुठलीच वैज्ञानिक चाचणी झाली नसल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
सिद्धा उपचार
तामिळनाडूत ‘सिद्धा’ उपचाराची एक पारंपरिक आणि प्राचीन पद्धती प्रचलित आहे. सर्वसाधारणपणे याचा वापर आधुनिक जीवनशैलीशी संबंधित आजार म्हणजेच तणाव, निद्रानाश, रक्तदाब इत्यादींसाठी केला जातो. तामिळनाडूत ही उपचारपद्धत सुमारे 4 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आल्याचे मानले जाते. 18 आचार्यांना याचे जनक मानले जाते.