ऑनलाईन टीम / चेन्नई :
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी तामिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या मुलांना सरकारकडून 5 लाख रुपयांचे आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी शनिवारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कोविड केअर लिंकच्या अंतर्गत येणाऱ्या बाल स्वराज पोर्टलवर देखील अशा मुलांची आकडेवारी अपलोड करण्यासाठी मुलांच्या अधिकार संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आयोगाकडून निर्देश देण्यात आले आहेत. आयोगाने शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाचा प्रधान सचिवांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे.
यासोबतच राज्य सरकार अशा मुलाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील उचलणार आहे. तसेच 5 लाख रुपयांची रक्कम मुलाच्या नावाने जमा केली जाणार असून त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना व्याजासहित दिली जाणार आहे.
यासोबतच ज्या मुलांच्या आई वडील अशा दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल अशा मुलांना सरकारी आश्रय गृह किंवा छात्रावासमध्ये राहण्यासाठी प्राथमिकता दिली जाणार आहे.
तसेच कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी कोणा एकाचा मृत्यू झाला असेल अशा मुलांना तात्काळ स्वरूपात तीन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
ज्या मुलांची जबाबदारी नातेवाईक तथा अभिभावकांकडून घेतली जात आहे अशा मुलांना त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत प्रति महिना 3 हजार रुपये दिले जाणार आहेत.